Monday, April 29, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ११)

मांजराएवढा देह धारण करून त्यांनी सूर्यास्त झाल्यावर लंकेत प्रवेश केला. तेव्हा लंकेतील वैभव त्यांच्या दृष्टीस पडले. चारी बाजूंनी ती लंकापुरी रावणाच्या सुरक्षारक्षकांकडून सुरक्षित केलेली होती. त्यामुळे त्यांना ती लंका अजिंक्य भासली. परंतु राम व लक्ष्मण यांच्या पराक्रमाचा विचार केल्यावर मात्र त्यांना लंका जिंकता येईल अशी खात्री वाटली.   

लंकेत प्रवेश करतानाच हनुमानांचा सामना प्रथम लंकेची अधिष्ठात्री देवता लंकिणीशी झाला. रावणाच्या आज्ञेप्रमाणे वागणार्‍या त्या लंकिणीला हनुमानांनी आपण लंका नगरी पहाण्यास आलो आहे व लंकानगरी पाहून मी आलो तसाच परत जाईन असे सांगितले. तरीही लंकिणीने त्यांच्यावर प्रहार करताच हनुमानांनी तिच्यावर उलट प्रहार केला. लंकिणीला ब्रह्मदेवांने सांगितले होते की ‘जेव्हा तुझ्यावर कोणी वानर प्रहार करेल तेव्हा राक्षसांवर विपत्ती आली आहे असे तू समज.’ आता लंकिणीला कळून आले की राक्षसांच्या विनाशाचा काळ जवळ आला आहे. तेव्हा तिने हनुमानांना लंकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली. 

    तेव्हा हनुमानांनी लंकेच्या तटावरून उडी मारून डावा पाय प्रथम टाकून नगरीत प्रवेश केला. कारण शत्रूच्या नगरीत प्रवेश करावयाचा असल्यास डावा पाय पुढे टकावा हे शास्त्रज्ञान हनुमानांस होते. लंका नगरीत या घरावरून त्या घरावर उड्या मारत जात असता हनुमान सूक्ष्म निरीक्षण करत होते. नगराच्या मध्यभागी त्यांना रावणाचे गुप्तहेर दिसून आले. त्यातील काही दीक्षा घेतलेले, काही मस्तक मुंडन केलेले, काही जटाधारी, काही मृगचर्म परिधान केलेले, काही नग्न, काही एकाक्ष असे नानाविध गुप्तहेर त्यांच्या दृष्टीस पडले. धनुष्य, तलवार, शतघ्नी, मुसळ, परिघ, पट्टीश, वज्र, गोफण, पाश अशी नानाविध आयुधे त्यांच्या हातात होती. रावणाच्या अंत:पुराजवळ पहारा देणारे लाखो सैनिक होते. रावणाचे घर श्वेत कमलांनी सुशोभित अशा खंदकांनी वेढलेले होते. त्याच्या चारही बाजूस उंच तटबंदी होती. हजारो निशाचर त्या महालाचे रक्षण करत होते. त्या महालाभोवती हेम व जांबुनद या दोन प्रकारच्या सोन्याची तटबंदी होती. हिरे मोत्यांनी ती तटबंदी सुशोभित केलेली होती. त्या रावणाच्या महालात व सभोवती असलेल्या इतर राक्षसांच्या घरात हनुमानांनी सीतेचा शोध घेतला. प्रहस्त, महापार्श्व, कुंभाकर्ण, महोदर, विरूपाक्ष, विद्युज्जिह्व, विद्युन्माळी, वज्रदंष्ट्र, शुक, सारण, इंद्रजित, जंबुमाळी, सुमाळी अशा अनेक राक्षसांच्या घरात त्यांनी सीतेला शोधले. सीतेचा शोध घेत असता हनुमानांना रावणाचा ऐश्वर्ययुक्त महाल, त्यातील रावणाच्या असंख्य पत्नी, पुष्पक विमान, रावणाच्या महालाचे रक्षण करणार्‍या अक्राळ-विक्राळ राक्षसी त्यांना दिसल्या. तेथे रावणाच्या महालात अतिशय सुंदर स्त्री हनुमानांना दिसली. प्रथम रूप व यौवनाने संपन्न अशा मंदोदरीला पाहून ती स्त्री सीताच असावी असे हनुमानांना वाटले व त्यांना आनंद झाला. पण त्यांनी विचार केला की रामाच्या वियोगाने संतप्त झालेली स्त्री अशा प्रकारे शृंगार, भोजन, मदिरासेवन करणे शक्य नाही. परपुरुषाच्या शय्यागृहात जाणेही शक्य नाही. तेव्हा ही निश्चयाने सीता नाही असा त्यांच्या मनाने त्यांना कौल दिला व त्यांचा सीताशोध पुन्हा सुरु झाला पण सीता मात्र कुठेही दिसत नव्हती.  

    रावणाच्या व इतर राक्षसांच्या महालात असंख्य अस्याव्यस्त पडलेल्या स्त्रिया हनुमानांच्या दृष्टीस पडल्या. परस्त्रियांचे अवलोकन कराणे हे धर्मास अनुसरून नव्हते. तसेच पापी रावणास पाहिल्यामुळेही आपला धर्मलोप झाला की काय असेही हनुमानांना वाटू लागले. परंतु सीतेचा शोध घेत असता त्यांच्या दृष्टीस स्त्रिया पडल्या होत्या. स्त्रियांचे अवलोकन करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांना पाहून हनुमानांच्या चित्तात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही. शुभ अथवा अशुभ कर्मास प्रेरणा देण्यास मनच कारणीभूत असते. पण हनुमानांचे मन पूर्णत: स्थिर होते. सीतेला स्त्रियांच्याच समुदायामधे शोधणे भाग होते. त्यामुळे परस्त्रीदर्शन अपरिहार्य होते. त्यामुळे आपल्याला परस्त्रीदर्शन धर्माचा लोप करण्यास कारणीभूत होणार नाही अशी त्यांच्या मनाने त्यांना ग्वाही दिली. 

    सीता जिवंत तरी आहे की नाही अशी हनुमानांना भीती वाटू लागली. सीता जिवंतच नसली तर आपले सर्व परिश्रम व्यर्थ ठरतील असे त्यांना वाटू लागले. 

अस्मिन्नेवंगते कार्ये प्राप्तकालं क्षमं च किम् ।
भवेदिति मतं भूयो हनुमान् प्रविचारयन् ॥५-१३-१९ ॥ 

“ज्यावेळी कुठलेही कार्य करणे दुष्कर असते अशा परिस्थितीत या समयास उचित ठरेल असे कशा रीतीने वागावे या संबंधी हनुमान वारंवार विचार करू लागले.” सीतेचे दर्शन न घेता जाणेही त्यांना उचित वाटत नव्हते. कारण मग समुद्रोल्लंघनाचे कष्टही फुकट गेले असते. रिक्त हस्ताने परत गेल्यास सर्व वानरांना व रामांना काय वाटेल अशी चिंता त्यांना वाटू लागली. म्हणून पुन्हा उत्साह धरून त्यांनी सीताशोधास प्रारंभ केला.

   सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment