Friday, April 12, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३१

    पांडवांना चुकवून पुन्हा ते तिघे सरोवरासमीप आले व आपल्या सहाय्याने दुर्योधनाला पांडवांशी युद्ध करण्याचा आग्रह करू लागले. तेव्हा त्यांची दुर्योधनाशी चाललेली बातचीत तेथे आलेल्या काही व्याधांनी ऐकली व धनाच्या आशेने त्यांनी ती बातमी युधिष्ठिराला जाऊन सांगितली. तेव्हा श्रीकृष्णांसह पांडव त्या द्वैपायन सरोवराजवळ आले. मायेने पाणी स्तंभित करून दुर्योधन सरोवरात गेला असल्याचे त्यांना कळले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, “राजन्, मायावी दुर्योधनाचा यावेळी आपण मायेचा आश्रय घेऊनच वध करा. ‘मायावी मायया वध्य:’ अशी नीती आहे. मायावीचा वध मायेनेच केला पाहिजे. तेव्हा आपण अनेक उपाय करून दुर्योधनाचा वध करा. मायावी दैत्यांचा इंद्राने, बली, हिरण्य़ाक्ष, हिरण्यकशिपु यांचा श्रीहरीने  सुद्धा मायावी उपायांनीच नाश केला होता. अशी अनेक पूर्वीची उदाहरणे देऊन श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला पराक्रम प्रगट करण्य़ास सांगितले. तेव्हा युधिष्ठिराने दुर्योधनाला आपल्याबरोबर क्षत्रियोचित युद्ध करण्य़ास ललकारले. पांडवांना पराजित तरी कर किंवा वीरोचित मरण तरी पत्कर. पण दुर्योधन पाण्याबाहेर येण्य़ास तयार नव्हता. उलट तूच पृथ्वीचे राज्य कर व मी मृगचर्म धारण करून वनात जाईन असे तो त्याला उत्तर देत होता. पण युधिष्ठिर दुर्योधनाला पराजित केल्याशिवाय राज्याचा स्वीकार करण्य़ास तयार नव्हता. 

    शेवटी दुर्योधनाने सांगितले तुम्ही सर्व रथी अहात व मी जमिनीवर आहे. तेव्हा मी तुमच्याशी एकेकाशी युद्ध करीन. ही गोष्ट युधिष्ठिराने मान्य केली व बोलण्याच्या ओघात म्हणाला की ‘तुला जे शस्त्र पसंत असेल ते घेऊन तू आमच्याशी एकेकाशी युद्ध कर. किंवा आमच्यापैकी एकाचा जरी तू वध केलास तरी राज्य तुझे होईल.’ 

    युधिष्ठिराच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि श्रीकृष्ण संतापले. कारण दुर्योधन गदायुद्धात श्रेष्ठ होता. त्याची बरोबरी फक्त पांडवांमधे भीमच करू शकत होता. भीम व दुर्योधन या दोघांनी गदायुद्धाचे शिक्षण बलरामांकडे घेतले होते.  त्याने जर गदायुद्धासाठी भीम सोडून पांडवांपैकी इतर कोणालाही युद्धासाठी आव्हान दिले असते तर हातातोंडाशी आलेला विजय पांडव घालवून बसले असते. दुर्योधनाने भीमाची लोखंडी मूर्ती बनवून त्या मूर्तीबरोबर तेरा वर्षे गदायुद्धाचा अभ्यास केला होता. तेव्हा त्याला गदायुद्धात हरवणे कठिण होते. म्हणून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, ‘किमिदं साहसं राजंस्त्वया व्याहृतमीदृशम् ?’ ‘तू आमच्या पैकी एकाला मारून राज्य प्राप्त कर’ असे बोलण्याचे दु:साहस तुम्ही कसे केलेत ? आपण आता यावेळी पूर्वी सारखाच जुगार खेळला अहात. आणि हा जुगार शकुनीशी खेळलेल्या जुगारापेक्षाही भयानक आहे. भीमसेनही गदायुद्धात प्रवीण आहे, पण दुर्योधनाने गदायुद्धाचा अधिक अभ्यास केला आहे. आज आपण स्वत: मोठ्या संकटात फसले आहात व आम्हा लोकांनाही संकटात टाकले आहे. आता तुमचा एकच शत्रु जिवंत आहे आणि हातात आलेले राज्य तुम्ही पुन्हा डावावर लावले आहे. असा अविचार दुसरा कोण बरे करेल ? मला तर असे वाटते की पांडुराजा व कुंतीचे पुत्र राज्य भोगण्याचे अधिकारीच नाहीत. विधात्याने त्यांना अनंतकाळपर्यंत वनवास भोगण्यासाठीच जन्माला घातले आहे.”  

    श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या या वागण्यामुळे खूप हताश झाले. तेवढ्यात भीमाने त्यांना आपण दुर्योधनाचा वध करू म्हणून आश्वासन दिले व दुर्योधनाला निवडीचे स्वातंत्र्य न देताच  त्याने त्याला गदायुद्धाकरता आव्हान दिले. 

    श्रीकृष्णांनी भीमाचे कौतुक केले. धृतराष्ट्राच्या सर्व पुत्रांचा वध भीमानेच केला होता. पण तरीही अधिक आत्मविश्वास घातकच असतो. म्हणून श्रीकृष्णांनी त्याला सल्ला दिला की, ‘तू अवश्य दुर्योधनाचा वध करशील. परंतु  त्याच्याशी प्रयत्नपूर्वक युद्ध करायला हवे. कारण तो बलवान व युद्धकलेत कुशल आहे व त्याने तेरा वर्षे गदायुद्धाचा अभ्यास केला आहे. तू बलवान असलास तरी अभ्यास करणार्‍याची योग्यता अधिक मानली गेली आहे. तेव्हा प्रयत्नपूर्वक युद्ध कर व ह्या पृथ्वीचे राज्य युधिष्ठिराच्या चरणी अर्पण कर.’ असे बोलून भीमाला युद्धासाठी प्रोत्साहन दिले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment