Sunday, April 21, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ४)

    किष्किंधेचे राज्य प्राप्त झाल्यावर लगेचच पावसाळा सुरु झाला असल्यामुळे सीतेचा शोध घेण्याच्या कामात चार महिन्यांचा विलंब होणार होता. तोपर्यंत थांबणे भागच होते. पण या चार महिन्यात सुग्रीव उपभोगांमधे मग्न झाला होता. त्याने सर्व राज्यकारभार आपल्या मंत्र्यांवर सोपवला होता. त्यावेळी हनुमानांनी सुग्रीवाला मित्रकार्याची आठवण करून दिली. हनुमानांचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात - 

    निश्चितार्थोऽर्थतत्त्वज्ञः कालधर्मविशेषवित् ॥४-२९-६॥
    प्रसाद्य वाक्यैविविधैः हेतुमद्‌भिर्मनोरमैः ।
    वाक्यविद् वाक्यतत्त्वज्ञं हरीशं मारुतात्मजः ॥४-२९- ७॥
    हितं तथ्यं च पथ्यं च सामधर्मार्थनीतिमत् ।
    प्रणयप्रीतिसंयुक्तं विश्वासकृतनिश्चयम् ॥४-२९-८॥
    हरीश्वरमुपागम्य हनुमान् वाक्यमब्रवीत् ॥४-२९-९॥ 

    “पवनकुमार हनुमान् शास्त्राच्या निश्चित सिद्धांताला जाणणारे होते. काय करावयास पाहिजे आणि काय नाही या सर्व गोष्टींचे त्यांना यथार्थ ज्ञान होते. कुठल्या समयी कुठल्या विशेष धर्माचे पालन केले पाहिजे हेही ते ठीक-ठीक जाणत होते. हनुमान् वानरराज सुग्रीवांजवळ गेले आणि त्यांना युक्तियुक्त विविध आणि मनोरम वचनांच्या द्वारा प्रसन्न केले. वाक्यतत्त्वज्ञ असणार्‍या हनुमानांनी त्या सुग्रीवाला हितकर, सत्य, लाभदायक, साम, धर्म आणि अर्थनीतिने युक्त शास्त्रविश्वासी पुरुषाच्या सदृढ निश्चयाने संपन्न तसेच प्रेम आणि प्रसन्नतायुक्त वचन बोलले. हनुमान सुग्रीवाला म्हणतात, “राजन् ! आपण राज्य आणि यश प्राप्त केले आहे तसेच कुलपरंपरेने आलेल्या लक्ष्मीलाही वाढविले आहे; परंतु आता मित्राचे कार्य करणे शेष राहिले आहे. ते आपणाला या समयी पूर्ण केले पाहिजे. जो राजा ‘प्रत्युपकार केव्हा केला पाहिजे’ ही गोष्ट जाणून मित्रांच्या प्रति सदा साधुतापूर्ण आचरण करतो, त्याच्या राज्य, यश आणि प्रतापाची वृद्धि होते.” मित्रकर्तव्याची त्यांनी सुग्रीवाला आठवण तर करून दिलीच पण त्याचबरोबर राजकर्तव्याचीही त्यांनी जाणीव करून दिली. हनुमान म्हणतात, “पृथ्वीनाथ ! ज्या राजाचा कोश, दण्ड, सेना, मित्र आणि स्वतःचे शरीर - ही सर्वच्या सर्व समान रूपाने त्याच्या वश राहातात, तो विशाल राज्याचे पालन करतो आणि त्या राज्याचा उपभोग घेतो. आपण सदाचाराने संपन्न आणि नित्य सनातन धर्माच्या मार्गावर स्थित आहात. मित्राच्या कार्याला सफल बनविण्यासाठी जी प्रतिज्ञा केली आहे, ती यथोचित रूपाने पूर्ण करावी. जो आपली सर्व कार्ये सोडून मित्राचे कार्य सिद्ध करण्यासाठी विशेष उत्साह दाखवत नाही त्याला अनर्थाचे भागी व्हावे लागते. कार्य साधण्याचा उपयुक्त अवसर निघून गेल्यावर जो मित्राच्या कार्याच्या मागे लागतो, तो मोठ्यात मोठी कार्ये सिद्ध करूनही मित्राचे प्रयोजन सिद्ध करणारा मानला जात नाही. शत्रुदमना ! भगवान् राघव आपले परम सुहृद आहेत. त्यांच्या या कार्याचा समय निघून जात आहे. म्हणून वैदेही सीतेचा शोध घेण्यास आरंभ केला पाहिजे. राजन् ! परम बुद्धिमान् श्रीराम समयाचे ज्ञान राखतात आणि त्यांना आपल्या कार्याच्या सिद्धिसाठी घाई झालेली आहे, तरीही ते आपल्या अधीन होऊन राहिले आहेत. संकोचवश, ते ‘माझ्या कार्याचा समय निघून चालला आहे’ असे आपल्याला सांगत नाहीत. वानरराज ! भगवान् राघव दीर्घकाळपर्यंत मैत्री निभावणारे आहेत. ते आपल्या समृद्धिशाली कुलाच्या अभ्युदयाचे हेतु आहेत. त्यांचा प्रभाव अतुलनीय आहे. गुणांमधे बरोबरी करण्यात कोणीही त्यांच्या तोडीचे नाही. आता आपण त्यांचे कार्य सिद्ध करावे, कारण त्यांनी आपले काम आधीच सिद्ध केलेले आहे. आपण प्रधान प्रधान वानरांना या कार्यासाठी आज्ञा द्यावी.” 

    “श्रीरामांनी सांगण्यापूर्वीच जर आपण या कार्याचा प्रारंभ केला तर वेळ निघून गेली असे मानले जाणार नाही, परंतु जर त्यांना यासाठी प्रेरणा करावी लागली तर मग असेच समजले जाईल की आपण वेळ घालविला आहे, त्यांच्या कार्यास फारच उशीर लावला आहे. वानरराज ! ज्याने आपला काही उपकार केलेला नाही त्याचे कार्य सुद्धा सिद्ध करणारे आपण आहात; मग ज्यांनी वालीचा वध तसेच राज्य प्रदान करून आपल्यावर उपकार केले आहेत, त्यांचे कार्य आपण शीघ्र सिद्ध कराल हे काय सांगायला हवे का ? यात संदेह नाही की दशरथकुमार भगवान् श्रीराम आपल्या बाणांनी समस्त देवता, असुर आणि मोठमोठ्या नागांनाही आपल्या वश करू शकतात तथापि आपण जी त्यांचे कार्यास सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे, त्याचीच ते वाट पहात आहेत. त्यांनी आपल्यासाठी वालीचे प्राण घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. ते आपले फार मोठे प्रिय कार्य करून चुकले आहेत, म्हणून आता आपण त्यांची पत्‍नी वैदेही सीतेचा या भूतलावर आणि आकाशात ही शोध घ्यायला हवा. वानरराज ! असे शक्तिशाली आणि प्रथमच उपकार करणार्‍या भगवान् रामांचे प्रिय कार्य आपल्याला आपली सर्व शक्ति पणाला लावून केले पाहिजे.” ॥४-९-९ते२५॥ 

    हनुमंतांनी किती सौम्य पण परिणामकारक भाषेत सुग्रीला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. सुग्रीव आता राज्याचा स्वामी आहे. तेव्हा त्याला न दुखावता त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे काम सोपे नव्हते. त्याला त्याच्या चुकांची जाणीव तर व्हायला हवी पण त्याचवेळी त्याला रागही येता कामा नये हे हनुमानांना पथ्य पाळावयाचे होते. ह्या कामात ते यशस्वीही झाले. दीर्घकाळानंतर प्राप्त झालेल्या राज्यात आसक्त होऊन आपण मित्रकार्य विसरलो याची सुग्रीवाला जाणीव झाली व त्याने हनुमानांच्या बोलण्याचा राग न मानता श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्याचा निश्चय केला.

सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment