Monday, May 6, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १८)

रामांकडे येताच प्रथम हनुमानांनी काय केले असेल तर रामांच्या चरणांवर मस्तक टेकवून सीतेच्या पातिव्रत्याची खात्री दिली व सीतेने दिलेला चूडामणी रामांच्या हातात दिला व सीता कशी तरी जीवन धारण करीत असल्याचे, तसेच राक्षसी तिला देत असलेला त्रास, रावणाने तिला दिलेली दोन महिन्यांची मुदत व तोपर्यंत जर राम आले नाहीत तर सीतेची प्राणत्याग करण्याची तयारी या सर्व गोष्टी  सांगितल्या व सीतेचा संदेश ऐकवला. तो चूडामणी पाहून व खुणेची कावळ्याची गोष्ट ऐकून कपिराज सीतेला भेटले असल्याची रामांची खात्री पटली व सीतेच्या आठवणीने ते विलाप करू लागले. 

    हनुमानांकडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर रामांनी हनुमानांची प्रशंसा केली. या समयी रामांजवळ प्रिय संदेश ऐकवल्यावर देण्यायोग्य पुरस्काराचा अभाव असल्यामुळे त्यांनी हनुमानांना आलिंगन दिले. 

    नंतर सर्वानुमते लंकेकडे प्रयाण करण्याचे ठरले. रामांनी हनुमानांना दुर्गम लंकानगरीचे प्रत्यक्ष पहात असल्याप्रमाणे वर्णन करण्यास सांगितले. रावणाची सेना, पुरीचे दरावाजे, लंकेच्या रक्षणाचे उपाय, राक्षसांची भवने या सर्व गोष्टींची माहिती रामांनी विचारल्यावर हनुमानांनी त्यांना सविस्तर माहिती सांगितली. लंका दुर्गम असली तरी आपण तेथील संक्रम, तटबंदी, खंदक राक्षससेनेचा एक चतुर्थांश भाग कसा नष्ट केला आहे तेही सांगितले. समुद्रोल्लंघन केले की लंका जणु जिंकल्यासारखीच झाली अशी त्यांनी रामांना खात्री दिली.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Sunday, May 5, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १७)

    त्याचे भाषण ऐकून क्रोधाविष्ट झाल्याने कठोर बनलेले ते राक्षस हनुमंताच्या पुच्छाला जुन्या पुराण्या फाटक्या सुती कपड्‍यांच्या चिंध्या गुंडाळू लागले. महाकपि हनुमान आपले शरीर आणि पुच्छ वृद्धिंगत करू लागले. राक्षसांनी चिंध्या गुंडाळल्यानंतर त्यांच्या पुच्छावर तेल ओतून त्याला आग लावून दिली. तेव्हां हनुमानांचे हृदय क्रोधाने भरून गेले. आपल्या पेटलेल्या पुच्छानेच त्यांनी राक्षसांना झोडपण्यास सुरूवात केली. तेव्हां क्रूर राक्षसांनी मिळून पुन्हा त्या वानर शिरोमणीना करकचून बांधून ठेवले. त्या वेळी वीर हनुमान करकचून बांधलेले असतांना त्या समयास अनुसरून विचार करू लागले. मी जरी बद्ध झालो असलो तरी राक्षसांचे माझ्यापुढे काही एक चालणार नाही. मी हे पाश तोडून टाकून एका उड्‍डाणात यांना मारून टाकीन. संग्रामामधे सर्व राक्षसांचा संहार करण्यास हनुमान एकटे समर्थ असले तरी त्यांनी ते बंधन मुकाट्याने स्वीकारले. त्यांनी विचार केला की राक्षस आपली नगरातून धिंड काढणार असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा लंकानगरी दिवसा नीट पहायला मिळेल. त्यामुळे हनुमानांनी आपले दिव्य स्वरूप गुप्त ठेवले व ते बंधन आनंदाने स्वीकारले. महाकपीला बद्ध केल्याचा आनंद राक्षसांना झाला व ते त्यांना शंख व नगारे वाजवीत व त्यांच्या अपराधांची घोषणा करत  नगरात फिरवू लागले. पुढे हनुमान व मागे राक्षस अशी वरात चालली होती. नगरातून फिरत असता हनुमानांनी नगरीतील चित्रविचित्र विमाने, तटबंदी असलेले भूभाग, पृथक पृथक बनविलेले सुंदर चबुतरे पाहिले. सुव्यवस्थितपणे रेखलेले चौक, घरांनी गजबजून गेलेले रस्ते, चव्हाटे, लहान मोठे मार्ग आणि घरांमधील मोकळे भूभाग, त्या वायुपुत्रानी नीटपणे निरखून पाहिले. 

    शेपूट जळत असलेल्या त्या वानरास पहाण्यास लंकेमधे गर्दी होऊ लागली. सीतेलाही ही बातमी समजली. तिने अग्निदेवाचे ध्यान केले व म्हणाली, “हे अग्निदेवा ! मी जर पतीची शुश्रुषा केली असेल, जर काही तप केले असेल अथवा माझ्या ठिकाणी जर पातिव्रत्य असेल तर हे अग्ने ! तू हनुमंताला शीतल असा भासमान हो.” सीतेच्या प्रार्थनेमुळे अग्नी हनुमानांकरता शीतल झाला. हनुमानांना आपल्या शेपटाच्या टोकावर जणु काही बर्फाचा गोळा आहे असेच वाटू लागले. नंतर त्या महाकपींनी पाश तोडून आकाशात वेगाने उड्डाण केले. आता आणाखी कोणते कार्य शेष राहिले त्याचा ते विचार करू लागले. प्रमदवन उध्वस्त करून झाले होते. मुख्य सेनानायकांसह राक्षसांची एक अंश सेना त्यांनी नाहिशी केली होती. रावणाची भेट झाली होती. आता त्यांनी पुच्छाला लागलेल्या अग्नीला लंकेतील श्रेष्ठ गृहांची आहुती द्यायचे ठरवून ते लंकेतील भवनांतून हिंडू लागले. एका घरावरून दुसर्‍या घरावर उड्डाण करत लंकेतील घरे जाळू लागले. बिभीषणाचे घर सोडून त्यांनी प्रहस्ताचा महाल, महापार्श्वाचे निवासस्थान, वज्रदंष्ट्र, शुक, सारण, मेघनाद, जंबुमाळी, सुमाळी, रश्मिकेतु, सूर्यशत्रू, ह्रस्वकर्ण, रोमश वगैरे सर्वांची घरे जाळली. नंतर ते रावणाच्या महालावर पोचले. वायूच्या सहाय्याने प्रदीप्त झालेला अग्नी घराघरांवर पसरू लागला. उंच उंच प्रासाद अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. सर्व लंकापुरी जळून भस्मसात होऊ लागली. नंतर महाकपी हनुमानांनी समुद्राच्या जलात आपली शेपटी बुडवून शेपटीची आग विझवली. 

    नंतर त्यांना चिंता वाटू लागली की या आगीत सीता सुद्धा दग्ध झाली नसेल ना ? 

धन्याः खलु महात्मानो ये बुद्ध्या कोपमुत्थितम् । 
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवांभसा ॥५-५५-३॥ 

“प्रदीप्त झालेला अग्नि ज्याप्रमाणे जळाने लोक विझवून टाकतात त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाला जे महामनस्वी महात्मा पुरुष आपल्या बुद्धीच्या द्वारा आवरून धरतात तेच खरोखरच संसारात धन्य आहेत.”  क्रोध हाच सर्वनाशाला कारणीभूत होतो. आपल्या क्षमेच्या बळावर जो क्रोधाचा त्याग करतो तोच खरा पुरुष. त्यांना वाटू लागले की आपण क्रोधाच्या आहारी जाऊन भलताच उद्योग करून बसलो. लंकेला लागलेल्या अग्नीत जर सीतेचीही आहुती पडली असेल तर आपण सर्व स्वामीकार्याचाच नाश केला आहे. धर्म व अर्थ याचा आपल्या हातून सर्वस्वी नाश झाला आहे, आपण पापाचे भागिदार बनलो आहोत अशा विचाराने ते व्यथित झाले. कदाचित सीतादेवीच्या धर्माचरणानेच सीतेचे रक्षण केले असेल असे वाटून त्यांना उत्साहही वाटला व ते सीतेची खुशाली पहाण्यासाठी पुन्हा अशोकवाटिकेकडे वळले. सीता खुशाल आहे हे पाहून त्यांना आनंद वाटला. तिला नमस्कार करून परत निघाले. सीतेने त्यांना उचित वाटत असेल तर आणखी एक दिवस थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली. पण हनुमानांनी तिला राम तुला सोडवायला नक्की येतील असे आश्वासन देऊन रामांना भेटायला परत समुद्रोल्लंघन करण्यासाठी अरिष्ठ नामक पर्वतावर चढले. दक्षिण तटावरून उत्तरतटाकडे जाण्यास त्यांनी आपल्या शरीरास खूप वाढवले उड्डाण केले. 

    मजल-दरमजल करत उत्तरतटाच्या निकट महागिरी महेंद्रावर दृष्टी पडताच मोठ्याने गर्जना करू लागले. गर्जनेने त्यांनी दाही दिशा दणाणून सोडल्या. हनुमानांचा सिंहनाद ऐकून सर्व वानर आनंदित झाले व हनुमान आपले काम नक्की फत्ते करून आले याची त्यांना खात्री वाटली. महेंद्र पर्वतावरून उतरून त्यांनी जांबवंत वगैरे वृद्द्ध मंडळी व स्वामीभावनेने अंगदालाही नमस्कार केला आणि त्यांना त्यांनी लंकेतील सर्व वृत्तांत सांगितला. सीतेचा शोध लागलेला कळताच सर्व वानर आनंदित झाले. हनुमानांनी सीतेच्या दुरवस्थेचे, तिच्या पातिव्रत्याचे, तेजस्वितेचे वर्णन करून वानरांना रावणाबरोबर युद्ध करण्यास उत्साहित केले. या हनुमानांच्या भाषणात नेतृत्वाचे गुण दिसतात. हनुमान म्हणाले, “मी एकटा सुद्धा राक्षसगणांसहित समस्त लंकापुरीचा वेगाने विध्वंस करण्यास आणि महाबलाढ्य रावणास मारण्यास पर्याप्त आहे. मग जर संपूर्ण अस्त्रांना जाणणारे आपल्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, शक्तिशाली आणि विजयाभिलाषी वानरांची सहायता मिळाली तर आणखी काय पाहिजे ? त्यांनी अंगद, जांबवान, नील, मैंद, द्विविद यांच्या सामर्थ्याचीही स्तुती केली. त्यामुळे वानरवीरांच्या अंगात वीरश्री संचारली. अंगदाला तर सर्व वानरांना घेऊन लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला घेऊनच रामांकडे जावे असेच वाटू लागले. परंतु श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेस सोडवून आणण्याची प्रतिज्ञा केली असल्यामुळे आपण सीतेला सोडवून आणणे उचित नाही असा जांबवानानी सल्ला दिला. त्याप्रमाणे सर्व वानरगण श्रीरामांना सर्व वृत्तांत निवेदन करण्यास निघाले.

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर

Saturday, May 4, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १६)

हनुमंतांचा    रावणास उपदेश  :

    रावणाला स्वत:ची ओळख करून दिल्यानंतर ते रावणाला म्हणाले, “हे महामान्य रावणा ! तू धर्म आणि अर्थ यांचे तत्त्व जाणतोस. तू फार मोठ्‍या तपाचाही संग्रह केला आहेस म्हणून परस्त्रीला आपल्या घरात डांबून ठेवणे तुला केव्हाही योग्य नाही. धर्माविरूद्ध कार्यात फार मोठे अनर्थ भरलेले असतात. ते कर्त्याचा समूळ नाश करून टाकतात. म्हणून तुझ्यासारख्या बुद्धिमान पुरुषाने अशा कार्यास प्रवृत्त होता उपयोगी नाही. हे राजन ! तिन्ही लोकात असा एकही प्राणी नाही की जो भगवान श्रीरामांचा अपराध करून सुखी राहू शकेल. म्हणून हे माझे धर्म आणि अर्थ यांना अनुसरून असलेले आणि सर्वकाळी हितावह असणारे भाषण तू लक्षात घे आणि जानकीला पुरुषश्रेष्ठ श्रीरामास परत दे. सीता तुझ्या घरात पाच फणा असलेल्या नागिणी प्रमाणे निवास करीत आहे. तिला तू पूर्णपणे ओळखलेले नाहीस. तू तपस्येचे कष्ट घेऊन हा धर्माचे फळस्वरूप जो ऐश्वर्याचा संग्रह केला आहेस आणि शरीर आणि प्राणांनाही दीर्घकाळ पर्यंत धारण करण्याची शक्ति प्राप्त केली आहेस, त्याचा विनाश करणे उचित नाही. तुला तपामुळे देव आणि असुर यांच्याकडून जी अवध्यता प्राप्त झाली आहे तिचे कारणही तुझे हे धर्माचरण आहे. जो पुरुष प्रबळ अधर्माच्या फळाने बांधला जातो तो बद्ध होतो, त्याला धर्माचे फळ मिळत नाही; त्याला त्या अधर्मफळाचीच प्राप्ती होते. हां, जर त्याने त्या अधर्मानंतर कुठल्याही प्रबळ धर्माचे अनुष्ठान केले तर ते अनुष्ठान पहिल्याने केलेल्या अधर्माचे नाशक होते.  तू पहिल्याने जो धर्म केला होतास त्याचे फळ तुला येथे पूर्णरूपाने प्राप्त झाले आहे, यांत संशयच नाही. आता या सीताहरणरूपी अधर्माचे फळही तुला लवकरच भोगावे लागेल. जनस्थानातील राक्षसांचा संहार, वालीचा वध आणि राम आणि सुग्रीव यांचे सख्य - या तीन कार्यांचा कार्यकारण संबंध नीट जाणून घे आणि त्यानंतर आपल्या हिताचा विचार कर. जिला तू सीता असे समजत आहेस आणि जी सांप्रत तुझ्या ताब्यात आहे, ती संपूर्ण लंकेचा नाश करणारी काळरात्रच आहे, हे तू लक्षात ठेव. सीतेचे शरीर धारण करुन तुझ्याजवळ काळाचाच पाश येऊन पोहोचला आहे. त्यात स्वतः होऊन गळा अडकवणे ठीक नाही म्हणून आपल्या कल्याणाचा तू आता काही तरी विचार कर. नाहीतर श्रीरामांच्या क्रोधाने प्रदीप्त झालेली आणि सीतेच्या तेजाने आधीच दग्ध झालेली ही लंकानगरी, तिच्यातील मार्ग, इमारती यांसह जळत असलेली पाहण्याचा प्रसंग तुझ्यावर येईल. हे स्वतःचे मित्र, मंत्री, कुटुंबी जन, भ्राते, पुत्र, हितचिंतक, स्त्रिया आणि सुखोपभोगाची सर्व साधने आणि संपूर्ण लंका यांना तू मृत्युमुखांत ढकलू नकोस. त्यांच्या नाशास कारण बनू नकोस. नृपश्रेष्ठ श्रीरामांचा तू आपल्या कृत्याने अपराध केला आहेस म्हणून तुझे जीवित सुरक्षित राहणे कठीण आहे.” रावणाला केलेल्या उपदेशातही हनुमानांचे धैर्य व बुद्धिमत्ता दिसून येते.  

    वीरभावाने निर्भयतापूर्वक भाषण करणार्‍या महाकपि हनुमंतांचे ते भाषण सुंदर आणि संयुक्तिक होते. तथापि रावणाला ते अप्रिय वाटले. तेव्हा रावणाने हनुमानाचा वध करावा अशी आज्ञा केली. पण बिभीषणाने दूताचा वध करू नये अशी शास्त्राज्ञा सांगितली. तसेच हा जर मारला गेला तर आकाशमार्गाने येथे येणारा दुसरा कोणी प्राणी मला दिसून येत नाही आहे, जो महासागर उल्लंघून या बाजूस येऊ शकेल. या परिस्थितीमध्ये शत्रूच्या गति आणि विधिचा पत्ता आपल्याला लागू शकणार नाही. ह्याचा वध झाला तर आपल्याला विरोध करणार्‍या त्या दोन्ही स्वतंत्र प्रकृतीच्या राजकुमारांना युद्धासाठी तयार करू शकेल असा दुसरा कोणी दूत आढळून येत नाही. म्हणून हनुमानांना दुसरा दंड देण्याचे रावणाने ठरवले. वानरांना आपले पुच्छ फार प्रिय वाटते आणि तेच त्यांचे आभूषण आहे. म्हणून राक्षसराज रावणाने अशी आज्ञा केली की या वानराचे पुच्छ पेटवून द्यावे आणि राक्षसगणांनी त्याला रस्त्या रस्त्यांतून आणि चव्हाट्‍यावरून संपूर्ण नगरांतून फिरवावे. त्याची धिंड काढावी.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Friday, May 3, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १५)

    रावणाने प्रहस्ताच्या पुत्रास जंबुमाळीस हनुमानांचा सामना करण्यास पाठवले. तो धनुष्याचा टणत्कार करित निघाला. त्या धनुष्याच्या प्रचंड टणत्काराने दिशा, उपदिशा आणि आकाशही एकदम दणाणून गेले. महातेजस्वी जंबुमाळीने दरवाजाच्या कमानीखालच्या दोन खांबावरील आडव्या लाकडावर बसलेल्या त्या महाकपि हनुमंतास तीक्ष्ण बाणांनी विंधण्यास आरंभ केला. जंबुमाळीच्या बाणांनी जखमी झाल्याने महाकपि हनुमंतांना अत्यंत क्रोध आला. शेजारीच असलेली प्रचंड लांबरूंद शिळा उपटून बलाढ्‍य हनुमंतानी अत्यंत वेगाने ती त्या जंबुमाळीवर फेकली. शेवटी रागाने त्यांनी परिघ हातात घेतला व तो जंबुमाळीच्या वक्षस्थळावर फेकला. त्यावेळी जंबुमाळी रथासहित ठार झाला. 

    मग रावणाने रागाने सात अमात्यपुत्रांना हनुमानांबरोबर युद्ध करण्यास पाठवले. हनुमानांनी त्या सात अमात्य पुत्रांच्या विशाल सेनेला भयभीत केले व सातही अमात्यपुत्रांना ठार मारले. त्यामुळे त्यांची विशाल सेना घाबरून पळून गेली. पुन्हा ते महाकपि दरवाज्यावर जाऊन बसले. आपण पाठवलेल्या वीरांना त्या वानराने सहज ठार मारून टकले हे पाहून रावणाला हनुमान म्हणजे साधासुधा वानर नाही याची खात्री पटली. म्हणून त्याने विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस व भासकर्ण या पाच सेनापतींना हनुमानास पकडून आणण्याची आज्ञा केली. ते पाच सेनापती अशोकवाटिकेकडे आले असता हनुमान त्यांना कसे दिसले याचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात, “पुढे गेल्यावर तो देदिप्यमान महाकपि त्यांना दिसला. स्वतःचेच ठिकाणी असलेल्या प्रभेने युक्त असल्यामुळे तो वानर उदयाचलावर येत असलेल्या सूर्याप्रमाणे भासत होता. प्रचंड वेग, अनुपम धैर्य, अतर्क्य सामर्थ्य, लोकोत्तर बुद्धि, अद्वितीय उत्साह, अनिर्वचनीय देह आणि अतुल पराक्रम यांनी युक्त असलेला तो वानर दरवाजावर बसलेला होता.” त्या पाच सेनापतींशी त्यांचे घनघोर युद्ध झाले. तेव्हा हनुमानांनी विकट गर्जना करून आपला देह अधिक विशाल केला व विजेचा स्त्रोत एकदम एखाद्या पर्वतावर पडावा त्याप्रमाणे महावेगवान हनुमानांनी आकाशांत एकदम उंच जाऊन एकाएकी दुर्धराच्या रथावर उडी मारली. त्यामुळे त्याच्या रथाचा चुराडा झाला व तो दुर्धर मृत्यु पावला. तसेच त्यांनी इतर सेनापतींचाही सेनेसह वध केला. 

    नंतर रावणाने आपला पुत्र अक्षकुमार यास पाठवले. युद्धात अक्षकुमाराचा पराक्रम पाहून हनुमान खूष झाले. पण त्याची उपेक्षा करणे योग्य नाही असे वाटून हनुमानांनी त्या राक्षसाचे दोन्ही पाय पकडले व त्याला आकाशात गरगर फिरवून युद्धभूमीवर आपटले. अक्षकुमाराचाही हनुमानांनी वध केला हे ऐकताच रावण खवळला व त्याने बाहुबळाने न तपोबळाने युक्त असा आपला पुत्र इंद्रजित याला हनुमानांबरोबर युद्धास पाठवले. त्याला पहाताच हनुमानांनी मोठ्याने गर्जना केली व आपले शरीर वृद्धिंगत केले आकाशात विचरण करू लागले. इन्द्रजित हनुमानांवर बणांनी प्रहार करत होता. पण हनुमान बाणांच्या पुढे उभे रहात व दोन्ही हात पसरून बघता बघता आकाशात उड्डण करून निघून जात. त्यामुळे इंद्रजिताला हनुमानांवर प्रहार करण्याची संधीच मिळत नव्हती. तसेच हनुमानांनाही  त्या वीराला जेरीस आणण्याची संधी मिळत नव्हती. दोघांनाही एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज लागत नव्हता. शेवटी इंद्रजिताने हनुमानांना ब्रह्मास्त्राने बद्ध केले. परंतु ब्रह्मदेवाने हनुमानांना वर दिला होता की माझे अस्त्र तुला एका क्षणात बंधनातून मुक्त करेल.’ ते मनात म्हणाले की ब्रह्मा, इंद्र आणि वायु यांनी माझे रक्षण केले असल्यामुळे या अस्त्राने जरी मी बद्ध झालो आहे तरी मला काहीही भीती नाही. परंतु राक्षसांनी मला बांधून नेले तर राक्षसराज रावणाशी मला बोलतां येईल हा एक मोठाच लाभ होईल यासाठी शत्रु मला खुशाल अस्त्राने बांधून नेऊ देत. याप्रमाणे कोणतेही कार्य विचारपूर्वक करणारे ते शत्रूवीरांचे संहारक हनुमान वरील प्रमाणे मनाचा निश्चय करून तसेच निश्चेष्ट पडून राहिले. तेव्हा तर शत्रूनी जवळ येऊन त्यांच्यावर सर्व बाजूनी हल्ला करून त्यांना धरले आणि ते त्यांची निर्भत्सना करू लागले, त्यावेळी जणु फार कष्ट होत आहेत याप्रकारे हनुमान ओरडू लागले. हनुमान निश्चेष्ट पडले आहेत असे पाहून राक्षसांनी त्यांना तागाच्या दोर्‍यांनी बांधले. शत्रुपक्षीय वीर राक्षसांनी बलात्काराने केलेले बंधन आणि निर्भत्सना हे त्यावेळी सर्व हनुमंतास आपल्या कार्यासाठी उचित वाटले म्हणून त्यांनी ते सहन केले. त्यांच्या मनात विचार आला की माझा पराक्रम ऐकून आणि माझ्याविषयीच्या कुतूहलामुळे स्वाभाविकच राक्षसराज रावण एकदा तरी मला पहाण्याची इच्छा करेल. त्याप्रमाणे राक्षसांनी त्यांना मारीत मारीत रावणाच्या पुढ्यात उभे केले. 

    रावणाला हनुमानांनी आपण सुग्रीवाचा मंत्री असून रामांनी पाठवलेला दूत आहोत अशी स्वत:ची ओळख करून दिली. रावणाचे धैर्य, शक्ती, तेज व त्याची राजोचित लक्षणे पाहून हनुमान मोहित झाले. रावणाच्या ठिकाणी अधर्म प्रबळ नसता तर हा राक्षसराज रावण इंद्रासहित संपूर्ण देवलोकांचा संरक्षक होऊ शकला असता असे त्यांना वाटून गेले. परंतु याच्या लोकनिंदित क्रूर कर्मामुळे दानवांसहित सर्वलोक भयभीत झाले होते.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Thursday, May 2, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १४)

    सीताशोधाचे कार्य पूर्ण झाले होते. परंतु त्यांच्या दृष्टीने एक कार्य मात्र बाकी राहिले होते. ते म्हणजे रावणाच्या बळाचा अंदाज घेणे. शत्रूच्या बळाचा अंदाज साम, दाम, भेद व दंड  या चार उपायांनी घेता येतो. पण येथे राक्षसांच्या ठिकाणी सामाचा काही उपयोग होणार नाही. ते द्रव्यसंपन्न आहेत म्हणून त्यांना दान देणेही योग्य नाही. शिवाय त्यांना बळाचा गर्व झालेला असल्याने भेदाने काम साध्य होणार नाही. म्हणून केवळ चौथ्या उपायाचा, दण्डाचा प्रयोग करणे हाच उपाय हनुमानांना ठीक वाटला. त्यांना पराक्रम करून दाखविणेच उचित वाटले. राक्षसांमधील मुख्य मुख्य वीर मारले गेले तरच हे राक्षस नरम होतील असे त्यांना वाटले. 

कार्ये कर्मणि निर्दिष्टे यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्यं कर्तुमर्हति ॥५-४१-५॥
न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः ।
यो ह्यर्थं बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥५-४१-६॥ 

मुख्य कार्य पार पडल्यावर, पहिल्या कार्याला बाधा न येऊ देता, जो अनेक कार्ये पार पाडतो तोच हाती घेतलेले कार्य उत्तम प्रकारे शेवटास नेण्यास समर्थ होतो. लहान लहान कार्ये असली तरीही एकाच उपायाने पार पडतील असे नाही. जो पुरुष कुठलेही कार्य अथवा प्रयोजन अनेक प्रकारांनी सिद्ध करण्याची कला जाणतो तोच कार्य सिद्धिस नेण्यास समर्थ होऊ शकतो. असा त्यांनी विचार केला. शत्रूशी आपल्या पक्षाला युद्ध करण्याचा प्रसंग आला तर कोण प्रबळ होईल आणि कोण कमजोर ठरेल, शत्रूमध्ये आणि आपल्यामध्ये विशेष काय आहे, हे समजून आल्यानंतर जर आपण वानराधिपती सुग्रीवाकडे गेलो तर आपल्याकडून स्वामीच्या आज्ञेचे पूर्णरूपाने पालन झाले असे समजले जाईल असे त्यांना वाटले. त्यासाठी ते युद्धाची संधी कशी मिळेल या बद्दल विचार करू लागले. म्हणजे त्यांना तुलनात्मक दृष्टीने कोणचे पारडे अधिक जड आहे याचा विचार करता आला असता. त्या युद्धात त्यांनी रावणाचे मंत्री, सेना आणि सहायकांसह रावणाचा सामना करून त्याच्या अंतःकरणातील भाव तसेच, सैनिकांची शक्ती याची माहिती करून घेण्याचा विचार केला. म्हणून युद्धास तोंड फुटावे म्हणून त्यांनी रावणाला प्रिय असलेल्या अशोकवाटिकेचा विध्वंस करण्याचे ठरवले. म्हणजे रावण निश्चितच रागावला असता व सेनेसहित हनुमानांवर चालून आला असता. आपल्या पराक्रमावर हनुमानांचा कमालीचा विश्वास होता. त्यांनी रावणाने पाठवलेल्या सर्व सेनेचा वध करून किष्किंधेला जायचा विचार केला. 

    त्याप्रमाणे त्यांनी आपल्या प्रचंड वेगाने अशोकवाटिकेतील मोठे मोठे वृक्ष उन्मळून टाकले. सीता ज्या वृक्षाखाली बसली होती तो वृक्ष सोडून त्यांनी सर्व प्रमदवनाची नासधूस केली व राक्षसांबरोबर युद्ध करण्याच्या इच्छेने  ते प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले. प्रमदवनातील राक्षसीणींना भीती वाटेल असे भयंकर रूप त्यांनी धारण केले. रावणाला ही वार्ता समजताच त्याने आपले किंकर नावाचे सैनिक पाठवून दिले. ते सर्व हनुमानांवर तुटून पडले. आपण रामांचा दास असल्याचे त्यांनी त्यांना गर्जून सांगितले. त्यांची ती सिंहगर्जना ऐकताच सर्व राक्षस भयभीत झाले. दरवाजावरील परीघ घेऊन त्यांनी त्या निशाचरांना मारण्यास प्रारंभ केला. त्या किंकर नामक राक्षसांचा वध केल्यावर हनुमान पुन्हा त्या प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले.  

    त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की येथील  राक्षसांच्या देवालयाचा नाश करावा. ते देवालयावर चढले व त्या प्रासादाची मोडतोड करू लागले. मोडतोड करत असता ते श्रीरामांच्या नावाचा जयजयकार करत होते व भयानक आवाजात गर्जना करत होते. त्यांची गर्जना ऐकून प्रासादरक्षक नानाविध अस्त्रे घेऊन आले. त्यांच्याशी युद्ध करतांना त्यांनी त्या प्रासादाचा सोन्याचा खांब उपटून काढला व तो ते जोराजोराने फिरवण्यास लागले. तेव्हा दुसर्‍या खांबाशी घर्षण होऊन अग्नी उत्पन्न झाला. त्यामुळॆ तो प्रासाद जळू लागला. हनुमानांनी त्या खांबानेच शेकडो राक्षसांना मारून टाकले. आणि आकाशात स्थित होऊन तेजस्वी वाणीने बोलले, “राक्षसांनो ! सुग्रीवाच्या आज्ञेत वागणारे माझ्यासारखे असे हजारो विशालकाय बलवान वानरश्रेष्ठ सर्व बाजूस पाठवले गेले आहेत. आम्ही आणि इतरही वानर मिळून सर्व पृथ्वी हिंडत आहोत. आम्हापैकी काहीना दहा हत्तींचे बळ आहे. काही त्यांच्यापेक्षाही बलाढ्‍य आहेत, त्याच्यांत शंभर हत्तींचे बळ आहे. तर कित्येक वानर असे आहेत की ते हजारो हत्तींप्रमाणे बल आणि पराक्रमाने संपन्न आहेत. कांहीचे बळ जलाच्या प्रवाहासारखे असह्य आहे. कित्येक तर वायुच्या समान बलवान आहेत आणि कित्येक वानर यूथपति आपल्या ठिकाणी असीम बळ धारण करणारे आहेत. दात आणि नखे हीच ज्यांची आयुधे आहेत असे अनंत बलशाली शेकडो, हजारो, लाखो, करोडो वानर बरोबर घेऊन वानरराज सुग्रीव येथे येईल. ते सर्व तुम्हां सर्व निशाचरांचा संहार करण्यास समर्थ आहेत. आता तर ही लंकापुरी राहाणार नाही, तुम्हीही राहाणार नाही आणि ज्याने इक्ष्वाकुवंशीय वीर महात्मा श्रीरामांशी वैर बांधले आहे, तो रावणही राहू शकणार नाही.”  

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर

Wednesday, May 1, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १३)

सूर्याचा उदय झाल्यावर ज्याप्रमाणे सर्वत्र पसरलेल्या अंधःकाराचे काही चालत नाही, तो निष्फळ होतो, नष्ट होतो त्याप्रमाणे अविवेकी किंवा असावधान दूताच्या हाती पडल्यावर जवळ जवळ पूर्ण होत आलेले कार्यही देश-काळ विरोधी होऊन असफळ, अयशस्वी ठरते. कर्तव्य आणि अकर्तव्य या विषयी निश्चित झालेली स्वामीची बुद्धिही अविवेकी दूतामुळे शोभून दिसत नाही कारण स्वतःला मोठा बुद्धिमान अथवा पण्डित समजणारा दूत आपल्या बेअक्कल वागण्याने कार्याचा नाश करून टाकतो. म्हणून काय केले असता हे कार्य बिघडणार नाही, काय केले असता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असावधानी होणार नाही आणि माझे समुद्रोल्लंघनही व्यर्थ ठरणार नाही, कुठल्या प्रकारे सीता माझे सर्व म्हणणे ऐकून तर घेईल पण घाबरणार मात्र नाही - या सर्व गोष्टी संबंधी हनुमान विचार करत होते. तेव्हा त्यांनी ठरवेले की आपण सीतेला रामांचे गुण गाऊन दाखवावेत म्हणजे ती उद्विग्न होणार नाही. येथेच बसून त्यांची सुंदर व धर्मानुकूल वचने तिला ऐकवावीत व श्रीरामांचा संदेश तिला ऐकवावा, म्हणजे तिचा त्या वचनांवर विश्वास बसेल व तिचा सर्व संदेह दूर होईल. असा विचार करून हनुमानांनी सीतेलाच ऐकू जाईल अशा जवळच्या जागेवर बसून श्रीरामकथा गावयास सुरवात केली.  

सर्व रामकथा ऐकवून त्यांनी श्रीरामांनी सीताप्राप्तीसाठी सुग्रीवाशी केलेले सख्यही तिला निवेदन केले व सीतेच्या शोधास सर्वदिशांना वानर रवाना झालेले असून त्यातीलच  आपण एक वानर असून समुद्रोल्लंघन करून येथे आलो असल्याचे त्यांनी तिला सांगितले. 

    आपल्याला कोण रामचरित्र ऐकवत आहे असे वाटून सीतेने आवाजाच्या रोखाने शिंशपावृक्षाकडे नजर टाकली. तेथे तिने वानररूपात हनुमानास पाहिले व ती घाबरून गेली. हा रावण तर वेष बदलूना आला नाही ना असे तिला वाटले. आपण एखादे स्वप्न तर पहात नाही ना असे तिला वाटू लागले. रामगुणांचे वर्णन करून हा आपले चित्त आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत असावा असे तिच्या मनात आले. सतत रामांचा विचार करत असल्यामुळेच आपल्याला हे रामचरित्र ऐकावयाला आले असावे असेही तिला वाटले. अशा संभ्रमित अवस्थेत असतांना हनुमान अशोकवृक्षावरून खाली उतरले व हात जोडून विनीतभावाने त्यांनी सीतेस नमस्कार केला. लवकरच तिची रामांशी भेट होईल, राम रावणाचा वध करतील, त्यांनीच आपल्याला येथे पाठवले असून आपला कुशलसमाचार तुला कळवण्यास सांगितला आहे या सर्व गोष्टींवर तिने विश्वास ठेवावा असे त्यांनी तिला सांगितले. दोघांनाही परस्परांच्या भेटीमुळे आनंद झाला. 

    सीतेने विचारले म्हणून हनुमानांनी पुन्हा रामांचे वर्णन करून ते सीतेसाठी कसे व्याकुळ झाले आहेत तिच्या प्राप्तीसाठीच त्यांनी सुग्रीवाशी सख्य कसे केले आहे ते सविस्तर सांगितले व तिचा विश्वास बसावा म्हणून रामनामांकित अंगठी त्यांनी तिला दिली. ती अंगठी पहाताच हनुमानाविषयीची तिची शंका दूर झाली. ‘परंतु काकुत्स्थकुळभूषण श्रीराम जर कुशल आहेत तर प्रलयाग्नीप्रमाणे ते कोपाने ही सर्व समुद्रवलयांकित पृथ्वी दग्ध का बरे करून टाकीत नाहीं ? आपले दु:ख दूर करण्यास ते इतका विलंब का लावतात की आपल्याबाबतीत ते स्नेहहीन झाले आहेत, किंवा त्यांचे मन अन्यत्र गुंतले आहे अशी शंका तिला आली. 

    तेव्हा हनुमानांनी  स्पष्ट केले की रामांना सीता लंकेमधे आहे याची काहीही कल्पना नाही. आपण येथून परत गेल्यावरच रामांनी ही गोष्ट समजणार आहे. त्यावेळी राम नक्कीच विशाल सेना घेऊन येतील व रावणाला ठार मारून सीतेची सुटका करतील अशी ग्वाही दिली. सीता जितकी रामांसाठी व्याकुळ झालेली आहे तसेच श्रीराम सुद्धा जानकीविना शोकाने व्याकुळ झालेले आहेत असे तिला सांगून हनुमानांनी तिला आश्वस्त केले.    
    हनुमानांचे बोलणे ऐकून सीतेने हनुमानांना लंकेत येण्यासाठी त्वरा करण्याचा निरोप दिला. सीता-हरणाला दहा महिने उलटून गेले होते. शेवटची दोन महिन्यांची मुदत देऊन रावण निघून गेला होता. या दोन महिन्यात राम आले नाहीत तर रामांना आपण जिवंत दिसणार नाही असेही तिने त्यांना सांगितले. तेव्हा हनुमानांनी तिला राम वानरांची व अस्वलांची विशाल सेना घेऊन येत आहे असा धीर दिला. आणि त्यातूनही आपणही तिला खांद्यावरून रामांपर्यंत पोचवू शकतो असे अभिवचन दिले. कारण त्यांना रामचंद्राचे लवकर प्रिय करण्याची इच्छा होती. 

    परंतु हनुमानांबरोबर जाणे तिला प्रशस्त वाटले नाही. एकतर अशा परपुरुषाबरोबर जाणे योग्य नव्हते. वायुवेगाने हनुमानाबरोबर जातांना आपल्याला चक्कर येईल, कदाचित आपण समुद्रातही पडू, कदाचित रावणाचे सैनिक पाठलाग करतील, अशा स्थितीत सितेचे संरक्षण व राक्षसांशी युद्ध या दोन्ही गोष्टी हनुमानास कशा जमतील अशी अनेक कारणे सीतेने सांगितली. सगळ्यात महत्वाचे कारण होते की जर राम स्वत: आले नाहीत तर ते त्यांना मानहानिकारक होईल. तेव्हा रामांनीच पराक्रम गाजवून आपल्याला येथून घेऊन गेले पाहिजे असे सीतेचे म्हणणे होते. ते हनुमानांना पटले. कारण ते बोलणे स्त्रीस्वभावाला व पतिव्रतांच्या विनयशीलतेला शोभणारेच होते. हनुमानांनी तिला वचन दिले की तिचे ते उत्तम भाषण आपण रामांच्या कानावर घालू. 

    त्यानंतर हनुमानांनी तिच्याजवळची एखादी वस्तु खूण म्हणून रामांना  देण्यासाठी मागितली. तेव्हा सीतेने त्यांना चित्रकूट पर्वतावर घडलेली कावळ्याची गोष्ट सांगितली. मांस खाण्याच्या उद्देशने एक कावळा सीतेला टोच मारत असतांना श्रीरामांनी  एक दर्भ ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून त्या कावळ्यावर सोडला. आपले प्राण वाचवण्यासाठी कावळा तिन्ही लोकात फिरून शेवटी रामांनाच शरण आला. पण ब्रह्मास्त्र फुकट जाणारे नव्हते म्हणून त्यांनी त्या कावळ्याच्या संमत्तीनेच त्याचा उजवा डोळा फोडला.  ही कथा सांगून तिने रामांना निरोप दिला की ‘तुम्ही यकश्चित कावळ्याला सुद्धा दंड दिला होतात तर या महान अपराध करणार्‍या रावणाला का बरे शिक्षा करत नाही ?’ असे म्हणून सीता रडू लागली. तेव्हा हनुमानांनी पुन्हा तिची समजूत काढली. ते म्हणाले, “हे देवी ! मी तुला सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्रीराम तुझ्या विरह-शोकाने पीडित होऊन अन्य सर्व कार्यापासून विमुख झाले आहेत. केवळ तुझेच चिंतन करीत असतात. श्रीराम दुःखी असल्याने लक्ष्मणही सदा अत्यंत चिंताक्रांत झाले आहेत. हे विशाल लोचने ! राघव समरांगणात क्रूरता प्रकट करणार्‍या रावणाला त्याच्या बंधुबांधवांसहित मारून तुला आपल्या पुरीला (अयोध्येला) घेऊन जातील.”
    नंतर सीतेने वस्त्रात बांधलेला चूडामणी बाहेर काढला व रामांना खूण म्हणून देण्यासाठी दिला. तो चूडामणी घेऊन हनुमानांनी सीतेला प्रणाम केला आणि तिला प्रदक्षिणा घालून त्यांनी परत फिरण्याची तयारी केली. जातांना त्यांनी पुन्हा श्रीराम सुग्रीवासह येथे येऊन रावणाला पराजित करून सीतेला सोडवून नेतील असे वचन दिले व त्यांनी उत्तरदिशेला प्रयाण केले.

                       
सौ. मनीषा अभ्यंकर

Tuesday, April 30, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १२)


    रावणाच्या महालात अशी टीचभरही जागा नव्हती की जेथे हनुमानांनी सीतेचा शोध घेतला नाही. सीतेच्या शोधकार्यात जसजसे यश मिळत नव्हते तसतसे हनुमान निराश होऊ लागले. प्रायोपवशेन करावे, वानप्रस्थ स्वीकारावा की सरळ रावणाचाच वध करावा, असे अनेक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. नंतर आपण अशोकवाटिकेत सीतेला शोधले नाही हे लक्षात येताच हनुमान अशोकवाटिकेत सीताशोधास निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी सर्व देव-देवतांना, श्रीरामचंद्रांना आपल्या कार्यात सफलता प्राप्त होण्यासाठी नमस्कार केला आणि अशोकवाटिकेच्या तटबंदीवर चढले. अशोकवाटिकेचे निरीक्षण करत ते एका शिंशपा वृक्षावर चढून बसले.
    तेथे थोड्या दूर अंतरावर हनुमानांनी एक उंच गोलाकार मंदिर पाहिले. व जवळच मलीन वस्त्र धारण केलेली व अलंकाररहित  एक स्त्री त्यांच्या दृष्टीस पडली. तिने केसांची एक लांब वेणी घातलेली होती. त्या स्त्रीला राक्षसस्त्रियांनी घेरलेले होते. उपवासामुळे ती स्त्री अत्यंत कृश दिसत होती व वारंवार सुस्कारे टाकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते व निरंतर ती दु:खात बुडून गेलेली होती. ती असहाय दिसत होती. रावण सीतेचे हरण करून घेऊन जात असता त्या दिवशी ज्या रूपात तिचे दर्शन झाले होते तशीच ही स्त्री दिसत होती. त्रिकूर्ण नावाची कर्णफुले, पोवळी जडवलेली कंकणे, वगैरे तिच्या ज्या आभूषणांची चर्चा त्यांनी रामांबरोबर केली होती तेच अलंकार सीतेच्या अंगावर होते. पण सीतेने खाली टाकलेले अलंकार मात्र तिच्या अंगावर यावेळी दिसत नव्हते. तिने अलंकार खाली टाकते समयी ज्या वस्त्रात गुंडाळलेले होते तसेच वस्त्र तिच्या अंगावर होते.  वाल्मीकी म्हणतात - 

तां समीक्षय विशालाक्षीं राजपुत्रीमनिंदिताम् ।    
तर्कयामास सीतेति कारणैरुपपादयन् ॥५-१५-४०॥
आता मात्र हनुमानांनी युक्तायुक्त कारणांच्या द्वारे हीच सीता आहे असे अनुमान केले. 

    राम व सीता या दोघांचेही मन एकमेकांच्या ठिकाणी जडलेले आहे म्हणूनच दोघेही जिवंत आहेत असेही त्यांना वाटून गेले. ही सीताच आहे असा मनाशी निश्चय झाल्यावर त्यांना आनंद झाला. पतिव्रता सीतेला सुद्धा ज्याअर्थी असे दु:ख भोगावे लागते त्याअर्थी ‘कालो हि दुरतिक्रम:’ असे त्यांना वाटू लागले. जिच्या साठीच रामांनी विराध, कबंध, वाली, त्रिशिरा, खर, दूषणासह १४ हजार राक्षस यांना ठार मारले; सुग्रीवाशी सख्य केले व आपणही समुद्रोल्लंघन केले तीच ही सीता आज अशा प्रकारे दु:खी झालेली पाहून त्यांना वाईट वाटले. तिच्या भोवती अक्राळ विक्राळ राक्षसिणी हातात नानाविध शस्त्रे घेऊन उभ्या होत्या. इतक्यात पहाटेच रावण अशोकवनात आलेला त्यांना दिसला. त्याचे बोलणे नीट ऐकू यावे म्हणून हनुमान थोडे जवळ आले व वृक्षांच्या पानात लपून बसले. 

    त्या रावणाला पहाताच भीतीने सीता थर थर कापू लागली. रावण तिचा अनुनय करत होता, तिला ऐश्वर्योपभोगांचे व पट्टराणीपदाचे आमीष दाखवत होता हे हनुमानांनी पाहिले व ती स्त्री सीताच असल्याची त्यांची खात्री पटली. सीता त्याची मागणी धुडकावून आपल्या पातिव्रत्य धर्मावर स्थित होती. ‘रावण ज्याप्रमाणे आपल्या पत्नींचे रक्षण करतो त्याप्रमाणे त्याने परस्त्रियांचेही रक्षण केले पाहिजे, त्याने स्वस्त्रियांच्या ठिकाणी अनुरक्त होऊन आपली अभिलाषा त्याने सोडून द्यावी, सदाचाराने वागावे व आपल्याला रामांकडे सन्मानाने परत पाठवावे, नाहीतर श्रीराम येथे असा काही बाणांचा वर्षाव करतील की लंकेत तिळभरही जागा रहाणार नाही’ वगैरे सीतेचे भाषणही हनुमानांनी ऐकले व तिच्या शुद्ध चारित्र्याविषयी हनुमानांची खात्री पटली.  

    सीतेला दोन महिन्यांची मुदत देऊन रावण तेथून निघून गेल्यावर इतर सर्व राक्षसी तिला रावणाची पत्नी होण्याचा सल्ला देत होत्या. कोणी तिला प्रेमाने तर कोणी धाकदपटशाने सांगत होत्या व सीता त्यांना असले निंद्य कर्म करण्यास नकार देत होती. आपला पती रावणाचा नाश करण्यास समर्थ आहे असे तिला अजूनही वाटत होते. परंतु इतके दिवस उलटून गेले तरी राम अजूनही लंकेत का येत नाहीत हे मात्र तिला कळत नव्हते. सीतेचा शोक पाहून व प्राणत्याग करण्याचा निश्चय ऐकून हनुमानांचे हृदय द्रवले. हनुमानांनी सीतेचा विलाप, रावणाचे व राक्षसिणींचे तिला धमकावणे वगैरे सर्व प्रसंग व्यवस्थित ऐकले होते. अशा परिस्थितीत राक्षसिणींच्या नकळत  सीतेशी वार्तालाप कसा करावा, तिचे सांत्वन कसे करावे, काय केले म्हणजे आपण श्रीरामांचे दूत म्हणून येथे आलो आहोत या विषयी तिची खात्री पटेल, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. ज्याप्रमाणे रामांना सीतेचा संदेश ऐकवून सांत्वना देणे उचित आहे त्याप्रमाणे सीतेलाही त्यांचा संदेश ऐकवून आश्वासन देणे योग्य ठरेल असे त्यांना वाटत होते पण राक्षस्त्रियांच्या समोर तिच्याशी संभाषण तरी कसे करणार ? असा त्यांचा मनाशी संवाद चालला होता. 

    हनुमानांनी ठरवले की राक्षसी इकडेतिकडे पहात आहेत अशी संधी साधून सीतेशी संवाद करावा. आपण वानर असलो तरी संस्कृत भाषेतच बोलावे. पुन्हा त्यांना शंका आली की आपली संस्कृत भाषा ऐकून सीतेला वाटेल की रावणच वेष बदलून आला आहे की काय. आपण जर एकदम समोर गेलो तर ती जनकनंदिनी घाबरून जाईल. तिच्या ओरडण्यामुळे राक्षसीही सावध होतील व मलाच मारण्याचा प्रयत्न करतील. मग मी समुद्राच्या परतीरास पोचणार तरी कसा व रामांना भेटून सीतेविषयी माहिती सांगणार तरी कसा ? किंवा मी येथे कैदी बनून गेलो तर रामांना हनुमान कोठे गेला त्याची गंधवार्ताही समजणार नाही. मग ते तिची प्राप्ती कशी करून घेऊ शकतील ? मी येथे हजारो राक्षसांना ठार मारू शकतो, पण मी जर युद्ध करण्यातच गुंतलो तर महासागराच्या परतीरास कसा पोचू शकेन ? बर युद्धात जय कोणला मिळेल याची शाश्वती नाही. ‘कश्च निःसंशयं कार्यं कुर्यात् प्राज्ञः ससंशयम्’ कोण असा बुद्धिमान असेल की जो संशयरहित कार्यास संशययुक्त बनविण्याची इच्छा करील ? ॥५-३०-३५॥  

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर