Sunday, April 28, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १०)

   हनुमंतांचा पुन्हा लंकाप्रवास सुरु झाला. जात असतांना वाटेत त्यांना सिंहिका नावाच्या राक्षसीने पाहिले. ती त्यांना त्यांची छाया पकडून ओढू लागली. त्यामुळे हनुमानांची गती अवरुद्ध झाली. नंतर सिंहिका आपले मुख पसरून हनुमानांना खाण्यासाठी धावली. तेव्हा हनुमानांनी आपला देह अत्यंत संकुचित करून तिच्या अक्राळ विक्राळ मुखामधे प्रवेश केला. तिच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांनी त्या राक्षसीचा वध केला. आकाशचारी सर्व प्राणी त्यामुळे आनंदित झाले. 

यस्य त्वेतानि चत्वारि वानरेन्द्र यथा तव । 
धृतिर्दृष्टिर्मतिर्दाक्ष्यं स्वकर्मसु न सीदति ॥ ५-१-२०१॥

ज्या पुरूषाच्या ठिकाणी तुझ्यासारखे धैर्य, प्रसंगावधान, बुद्धि आणि दक्षता (कौशल्य) हे चार गुण असतात, तो आपल्या कार्यात कधीही अयशस्वी होत नाही. असे आकाशचारी प्राणी त्यांना म्हणाले. हनुमानांच्याजवळ हे चारही गुण होते. 

    अखेर हनुमान समुद्राच्या पलिकडील तीरावर पोचले. आकाशामधूनच त्यांनी सर्वत्र दृष्टी टाकली. दक्षिण तटावरील मलय पर्वत, त्यावरील वनराजी, समुद्राला मिळणार्‍या नद्या, लंका नावाचे बेटही पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या विशाल शरीराकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे विशाल शरीर धारण करून लंकेत प्रवेश करणे योग्य होणार नाही. कारण तेथील राक्षसांच्या मनात कुतूहल उत्पन्न होईल व आपला भेद त्यांना कळून येईल. म्हणून त्यांनी आपल्या पर्वताकार शरीराचा संकोच केला व पुन्हा वानररूप रूप धारण केले.  

    दुस्तर अशा सागराचे उल्लंघन करून महाबली हनुमानांनी प्रथम त्रिकुट पर्वताचा आश्रय घेतला. तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले. नंतर ते वृक्षांनी आच्छादित पर्वत व प्रफुल्ल वनराजी यामधून विचरण करू लागले. लंकेत प्रवेश करून त्यांनी लंकेतील संरक्षणव्यवस्था, तेथील घरे, ऐश्वर्य यांचे निरीक्षण केले. पर्वताच्या शिखरावर वसलेली लंका त्यांना आकाशात तरंगत असल्याप्रमाणे दिसत होती. तिचे उत्तरद्वार गगनचुंबी होते. ती लंकानगरी भयानक राक्षसांनी व्याप्त होती. त्यांच्या हातात शूळ पट्टीश वगैरे शस्त्रे होती. ती लंकानगरी पाहिल्यावर हनुमानांच्या मनात विचार आला की ही लंका जी देवांनांही अजिंक्य आहे ती वानरांना जिंकणे शक्यच नाही. साम, दाम, दंड व भेद या उपायांचा येथे काही उपयोग होणार नाही. येथे फक्त अंगद, नील, सुग्रीव व आपण स्वत: हे चारच वानर येथेपर्यंत येऊ शकतात असे त्यांना वाटून गेले. 

    ज्या सीतेसाठी एवढा खटाटोप करायचा ती सीता प्रथम जिवंत आहे की नाही असा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा प्रथम सीतेचा शोध घेऊन हनुमानांनी नंतर लंका नगरी कशी जिंकता येईल याचा विचार करावा असे ठरवले.    

    म्हणून प्रथम ते सीताशोधाच्या मोहिमेवर निघाले. सीताशोधासाठी काय उपाय योजावा यावर त्यांनी दोन घटका विचार केला. रावणाच्या दृष्टीस न पडता त्यांना सीतेसे दर्शन करावयाचे होते. त्याच बरोबर रामकार्य बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावयाची होती. अयोग्य दूताची निवड केली तर देश व काल यांच्या प्रतिकूल कार्य करणारा हा दूत जवळ जवळ सिद्धीस गेलेली कार्येही नष्ट करतो. स्वत:ला शहाणा मानणारा दूतही अभिमानाने कार्य नष्ट करतो. तेव्हा आपण कसे वागले पाहिजे याचा ते स्वत:च्या मनाशी ऊहापोह करत होते. 

    आकाशमार्गाने प्रवास करत असता त्यांनी अति विशाल रूप धारण केले होते. लंकेत प्रवेश केल्यावर त्यांनी आपले वास्तविक वानररूप धारण केले होते. पण आता सीताशोधासाठी लंकेत फिरतांना हे वानररूपही पण उपयोगी पडणार नव्हते. कारण तेथे अतिशय शूरवीर व बलाढ्य राक्षस होते व त्यांची नजर चुकवून त्यांना सीतेचा शोध घ्यावयाचा होता. वास्तविक रूपात ते तिथे फिरले असते तर ते राक्षसांच्या दृष्टीस पडले असते व कदाचित राक्षसांनी त्यांना ठारही मारले असते. म्हणून त्यांनी लंकेत प्रवेश करतांना अतिशय छोटे रूप घेऊन रात्रीच्या वेळी प्रत्येक घरात घुसून सीतेचा शोध घेण्याचा विचार केला. 

अनेन रूपेण मया न शक्या रक्षसां पुरी । 
प्रवेष्टुं राक्षसैर्गुप्ता क्रूरैर्बलसमन्वितैः ॥ ५-२-३३॥ 

हनुमतांनी विचार केला की, “मी या रूपाने या राक्षसांच्या नगरीत प्रवेश करू शकत नाही कारण अनेक क्रूर आणि बलाढ्य राक्षस हिचे रक्षण करीत आहेत.” म्हणून त्यांनी समयोचित कार्य सिद्ध करण्यासाठी सहज डोळ्यांना दिसून येणार नाही अशा रूपाचा आश्रय घेऊन रात्रीच्या वेळी लंकेत प्रवेश करावयाचे ठरवले.

सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment