Wednesday, April 17, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३६

    अश्वत्थाम्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. व्यासांनी त्याला त्याच्या मस्तकावरील अमूल्यमणी पांडवांना देऊन त्या बदल्यात पांडवांना अश्वत्थाम्याला जीवदान द्यायला सांगितले. त्याच्या या कृत्याबद्दल श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की, “तू तीन हजार वर्षे पृथ्वीवर एकटा निर्जन स्थानी भटकत फिरशील. तुझ्या शरीरातून पू व रक्ताची दुर्गंधी येत राहील. त्यामुळे तुला दुर्गम स्थानांचा आश्रय करावा लागेल. तू सर्व रोगांनी पीडित होशील. आणि तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने दग्ध झालेल्या बालकाला मी जिवंत करीन.”  व्यासांनीही श्रीकृष्णांच्या बोलण्याला अनुमोदन दिले.

    त्याप्रमाणे उत्तरेचा पुत्र मृतावस्थेत जन्माला आला. श्रीकृष्णांनी त्याला जिवंत केले. कृपाचार्यांकडूनच तो शस्त्रविद्याही शिकला. व या भूमंडलाचा सम्राट झाला. 

भगवंतांनी गीतेत सांगितले होते की

    यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
    अभ्युथानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
    परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ।
    धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥४-८॥ 

    “जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्माचा उत्कर्ष होतो तेव्हा तेव्हा मी स्वत:ला अवतीर्ण करतो. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश व धर्मसंस्थापना करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेतो.” 

    या अवतारात भगवंतांनी पांडवांना हाताशी धरून धर्मसंस्थापना करण्याचे योजले होते. त्याप्रमाणे त्यांनी महायुद्धात स्वत: शस्त्र धारण न करताही पांडवांना मार्गदर्शन करून ह्या महायुद्धाचे यश पांडवांच्याच पदरात घातले. आणि युधिष्ठिरानेही 

    येषां च जगतीनाथो नाथ: कृष्णो जनार्दन: ।
    कथं तेषां जयो न स्याद् येषां धर्मो व्यपाश्रय: ॥१९-२७॥शल्यपर्व॥
    लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराभव: ।
    येषां नाथो हृषीकेश: सर्वलोकविभुर्हरि: ॥शल्यपर्व॥ 

    अखिल विश्वाचे प्रभू व सर्वांच्या इंद्रियांचे नियमन करणारे भगवान् श्रीहरी ज्यांचे स्वामी व संरक्षक आहेत त्यांनाच लाभ प्राप्त होतो व त्यांचाच जय होतो. त्यांचा पराजय कसा होऊ शकेल ?” 

    “संपूर्ण जगताचे स्वामी श्रीकृष्ण ज्यांचे रक्षक आहेत व ज्यांना धर्माचा आश्रय प्राप्त आहे त्यांचा विजय का होणार नाही ?” असे म्हणून युधिष्ठिरानेही श्रीकृष्णांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व यश भगवंताच्या पायाशी समर्पित केले. 

    श्रीरामाप्रमाणे मर्यादेने वागून ह्यावेळी दुष्टांचा नाश होणार नव्हता. हा श्रीकृष्णांचा लीलावतार होता. अनीतीने चालणार्‍या लोकांचा प्रतिकार सदासर्वकाळ नीतीने करता येत नाही, त्यासाठी काही वेळा अनीतीचाही आश्रय घ्यावा लागतो हेच ह्या अवतारात जसे श्रीकृष्णांनी दाखवून दिले. त्याप्रमाणे धर्माने वागणार्‍यांच्या पाठीशी सर्वकाळ भगवंत उभा असतो हेही दाखवून दिले.
 (समाप्त)

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment