Thursday, April 25, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ७)

हनुमानांची जन्मकथा 

    पुञ्जिकस्थला नावाची अप्सरा एकदा शापवशात् कपियोनीमध्ये वानरराज कुंजराची कन्या म्हणून अवतीर्ण झाली. ती इच्छे प्रमाणे रूप धारण करणारी होती. या भूतलावर तिच्या रूपाची बरोबरी करणारी दुसरी कुणीही स्त्री नव्हती. ती तीन्ही लोकामध्ये विख्यात होती. तिचे नाव अञ्जना होते. वानरराज केसरीशी तिचा विवाह झाला. 

    एक दिवस रूप आणि यौवनाने सुशोभित असणारी ती अञ्जना मानवी स्त्रीचे शरीर धारण करून पर्वतशिखरावर विचरत होती. तिने फुलांची आभूषणे धारण केली होती. ती लाल काठाचे पीत वस्त्र नेसली होती. पर्वताच्या शिखरावर उभी असतांना वायुदेवाने तिचे ते वस्त्र हळूच हरण केले. 

    तिचे सुंदर रूप पाहून पवनदेव कामाने मोहित झाले. त्यांच्या संपूर्ण अंगात कामभावाचा आवेश उत्पन्न झाला. मन अञ्जनेमध्येच लागले. त्यांनी त्या अनिंद्य सुंदरीला आपल्या दोन्ही विशाल भुजामध्ये धरून हृदयाशी धरले. अञ्जना उत्तम व्रताचे पालन करणारी सती नारी होती. म्हणून त्या अवस्थेत सांपडल्याने ती घाबरून गेली आणि म्हणाली - ‘कोण माझ्या या पतिव्रत्याचा नाश करू इच्छित आहे ?’ अञ्जनाचे बोलणे ऐकून पवनदेवाने उत्तर दिले- ’सुश्रोणि ! मी तुमच्या पातिव्रत्याचा नाश करीत नाही. म्हणून तुमच्या मनांतील हे भय दूर झाले पाहिजे. यशस्विनी ! मी अव्यक्त रूपाने तुझे आलिंगन करून मानसिक संकल्पाच्या द्वारा तुझ्याशी समागम केला आहे. यामुळे तुला बल-पराक्रमाने संपन्न आणि बुद्धिमान् पुत्र प्राप्त होईल. तो महान् धैर्यवान्, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी तसेच ओलांडून जाणे आणि उड्डाण करणे, उडी मारणे यात माझ्यासमान होईल.’ नंतर तिने एका पुत्राला एका गुहेत जन्म दिला. बाल्यावस्थेमध्ये एका विशाल वनामध्ये एक दिवस उदित होत असलेल्या सूर्याला पाहून त्या बालकाला असे वाटले की हे देखील कुठले तरी फळ आहे, म्हणून ते घेण्यासाठी त्याने एकाएकी आकाशात झेप घेतली. तीनशे योजने उंच गेल्यावर सूर्याच्या तेजाने आक्रान्त होऊनही त्या बालकाच्या मनात खेद वा चिंता उत्पन्न झाली नाही. अंतरिक्षात जाऊन जेव्हा तात्काळच तो बालक जेव्हा सूर्याजवळ पोहोचला, तेव्हा इंद्रांनी कुपित होऊन त्याच्यावर तेजाने प्रकाशित वज्राने प्रहार केला. त्यावेळी उदयगिरिच्या शिखरावर त्याच्या हनुवटीचा डावा भाग वज्राच्या प्रहाराने खण्डित झाला. तेव्हा पासून त्या बालकाचे नाम हनुमान् पडले. त्याच्यावर प्रहार केला गेला आहे हे पाहून गंधवाहक वायुदेवांना फार क्रोध आला. त्या प्रभञ्जन देवांनी तिन्ही लोकात प्रवाहित होण्याचे थांबवले. यामुळे संपूर्ण देवता घाबरून गेल्या. कारण वायु अवरूद्ध होण्यामुळे तिन्ही लोकात खळबळ उडाली. त्या समयी समस्त लोकपाल कुपित झालेल्या वायुदेवांची मनधरणी करू लागले. तेव्हा पवनदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांनी हनुमानांना असा वर दिला की हनुमान समरांगणामध्ये कुठल्याही अस्त्र-शस्त्र द्वारा मारले जाऊ शकणार नाहीत. वज्राच्या प्रहारानेही हनुमान पीडित झाले नाहीत हे पाहून सहस्त्र नेत्रधारी इंद्राला प्रसन्नता वाटली आणि त्यांनी हनुमानांना हा उत्तम वर दिला की, ‘मृत्यु तुमच्या इच्छेच्या अधीन राहील- तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेव्हाच तुम्हाला मृत्यु येईल, अन्यथा नाही.’ या प्रकारे हनुमान केसरीचे क्षेत्रज पुत्र आहेत व वायुदेवाचे औरसपुत्र. त्यामुळे हनुमानांचा पराक्रम शत्रुंसाठी भयंकर आहे. तेजाच्या दृष्टिनेही हनुमान वायुसमान आहेत. हनुमान पवनाचे पुत्र असल्यामुळे उड्डाण करण्यातही त्यांच्या सारखेच आहेत.

सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment