Sunday, March 31, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २०

भगदत्ताबरोबर युद्ध - 

    युद्धात सारथ्याचे काम हे कौशल्याचे आहे. कारण शत्रू घोड्यांवर, सारथ्यावर बाण मारून रथाचे तुकडे करून टाकीत असे. त्यामुळे रथीला ठार मारणे अधिक सुलभ होई. त्यामुळे शत्रूच्या बाणांपासून स्वत:ला, रथीला व घोड्यांना वाचवावे लागत असे. श्रीकृष्ण हे असेच कुशल सारथी होते. अर्जुनाचे संशप्तकांपैकी भगदत्ताबरोबर युद्ध चालले होते. भगदत्त अर्जुनावर बाणांच्या फैरी झाडत होता व ते बाण आपल्यापर्यंत पोचण्याआधीच अर्जुन ते बाण छिन्नविच्छिन्न करून टाकत होता. भगदत्ताच्या हत्तीला चुकवत श्रीकृष्ण रथ हाकत होते. शेवटी रागावलेल्या भगदत्ताने वैष्णवास्त्र अभिमंत्रित करून अर्जुनाच्या छातीवर सोडले. ते अस्त्र सर्वांचा विनाश करणारे होते. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा घाव स्वत:च्या छातीवर झेलला. ते अस्त्र श्रीकृष्णांनी छातीवर झेलताच त्याचे वैजयंतीहारात रूपांतर झाले. 

    आपण त्या घावाचा प्रतीकार करण्यास समर्थ असतांना व श्रीकृष्णांची युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा असतांना श्रीकृष्णांनी तो घाव आपल्या छतीवर झेलावा हे अर्जुनाला आवडले नाही. अर्जुनाने तसे बोलून दाखवताच श्रीकृष्ण त्याला म्हणाले की पूर्वी पृथ्वीने मला प्रार्थना केली होती हे अस्त्र आपला पुत्र नरकासुराला द्यावे. म्हणून मी हे अस्त्र नरकासुराला दिले होते. त्याच्याकडून ते भगदत्ताला मिळाले. हे अस्त्र भागदत्ताकडे असल्यामुळे भागदत्ताला जिंकणे अवघड होते.  म्हणून अर्जुनाच्या रक्षणाकरता व भागदत्ताला अस्त्ररहित करण्य़ाकरता आपण ह्या अस्त्राचा घाव आपल्या छातीवर झेलला. 

जयद्रथवध - 

    नंतर संशप्तकांबरोबर अर्जुनाला लढाईत गुंतवून कौरवांनी चक्रव्यूहाची रचना केली. अर्जुनाव्यतिरिक्त चक्रव्यूहामधे युद्ध करण्याची कला कोणी जाणत नव्हते. अर्जुनपुत्र अभिमन्यु याला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ते माहीत होते, पण त्य़ातून बाहेर कसे पडायचे ते माहीत नव्हते. पण तरीही अभिमन्यूने चक्रव्यूहभेद करायचे ठरवले. भीम, युधिष्ठिर त्याचे रक्षण करणार होते. पण अभिमन्यु चक्रवूह भेदून आत गेल्यावर भीमादी पांडवांना त्याच्या रक्षणासाठी जयद्रथाने पोहोचू दिले नाही व द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, बृहद्बल व कृतवर्मा अशा सहा वीरांनी मिळून एकाकी असहाय अवस्थेत अभिमन्यूला ठार मारले. हे कौरवांचे नियमबाह्य वर्तन होते. तेव्हा अर्जुनाने दुसर्‍या दिवशी जद्ररथाला ठार मारण्याची प्रतिज्ञा केलीच, पण त्याबरोबर अशी प्रतिज्ञा केली की सूर्यास्ताच्या आत जर जयद्रथाचा वध केला नाही तर आपण प्रज्वलित अग्नीत प्रवेश करू. शोकाच्या भरात अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली, पण त्यामुळे कौरवांचे फावले. एक दिवस जयद्रथाचे रक्षण केले की झाले. मग त्यांचा मुख्य शत्रु अर्जुन हा स्वत:च नाश पावणार होता. 

    आपल्या भावांचे व आपले मत न विचारताच अशी घोर प्रतिज्ञा करणे हे अर्जुनाचे हे दु:साहस श्रीकृष्णांनाही आवडले नाही. आधीच सैन्यबळ कमी. त्यात अविचाराने अशा प्रतिज्ञा जर पांडव करू लागले तर ते उपहासास पात्र ठरतील. श्रीकृष्णांनी गुप्तहेरांकरवी कौरव दळातील माहिती काढली होती की अर्जुनाची प्रतिज्ञा कळताच जयद्रथ घाबरला. त्याने सर्व कौरवांना आपले रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा कर्ण, भूरिश्रवा, अश्वत्थामा, वृषसेन, कृपाचार्य व द्रोण हे त्याचे रक्षण करणार आहेत द्रोणाचार्य असा व्यूह रचणार आहेत की मध्यभागी असलेल्या जयद्रथापर्यंत अर्जुन पोचूच शकणार नाही. तेव्हा त्या सहा महारथींना जिंकल्याशिवाय जयद्रथाला ठार मारता येणार नाही.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment