Friday, March 29, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १८

अर्जुनाला गीतोपदेश -  
    सर्वजण आपापले रथ घेऊन रणांगणाकडे निघाले. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्णांनी सारथ्य करत होते. त्यांनी त्या रथाच्या घोड्याचे लगाम जसे हातात घेतले तसेच अर्जुनाच्या जीवनरथाचे लगाम सुद्धा आपल्या हातात घेतले. त्यांनी अर्जुनाला दुर्गादेवीची प्रार्थना करायला सांगितले. त्यानुसार अर्जुनाने महिषासुरमर्दिनीचे सुंदर स्तोत्र गायिले व ‘जयो भवतु मे नित्यं त्वत्प्रसादाद् रणाजिरे’, ‘तुझ्या कृपेने रणांगणात माझा नेहेमी जय होऊ दे’ अशी प्रार्थना केली. त्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन देवी अंतरिक्षात भगवान श्रीकृष्णांच्या पुढ्यात प्रगट झाली व ‘स्वल्पेनैव तु कालेन शत्रूञ्जेष्यसि पाण्डव’ ‘तू अल्प कालावधीतच शत्रूंना जिंकशील’ असा वर दिला आणि पांडवसैन्य रणांगणाकडे निघाले. रणांगणावर आल्यावर अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले. कारण त्याला एकंदर दोन्ही सैन्यांची परिस्थिती, शत्रुपक्षातील सैन्याची मांडणी, आघाडीवर असणार्‍या लोकांचे निरीक्षण करावयाचे होते. आणि त्याचे हे वागणे कुशल योद्ध्याप्रमाणेच होते. त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व कौरव पक्षातील वीर त्याला दाखवले. इतका वेळ युधिष्ठिराला धीर देणारा अर्जुन, प्रत्यक्ष श्रीकृष्ण पाठीशी असतांना व दुर्गादेवीने विजयी होण्याचा आशीर्वाद दिलेला असतांना सुद्धा कौरवांचे सैन्य व त्यात असणारे आपले नातेवाईक पाहून गळाठून गेला. संजयाने जे ‘स्वजनवधामुळे पाप लागेल’ हे बी पेरले होते त्याचा त्याच्या मनात वटवृक्ष झाला. व परिणामी भैक्ष्यकर्म स्वीकारणे बरे असे वाटून हातपाय गाळून धनुष्य टाकून स्वस्थ बसला. नि:शस्त्र अशा आपल्याला कौरवांनी ठार मारले तरी चालेल पण मी लढणार नाही असा त्याचा ठाम निश्चय झाला होता. ‘हे वागणे क्षत्रियाला योग्य नाही, हा अवेळी झालेला मोह बरा नाही, तुझ्या आतापर्यंतच्या कीर्तीचा ह्या वागण्याने नाश होईल, तेव्हा करुणा टाकून युद्धाला उभा रहा’ असे श्रीकृष्णांनी सांगूनही ‘गुरुजनांच्या वधाचे व कुलक्षयाचे पाप लागेल’ हे त्याचे पालुपद चालूच होते. तेव्हा भगवंतांना त्याला उपदेश करून युद्धाला उभे करावे लागले. हाच भगवंतांचा उपदेश ‘श्रीमद्भगवद्गीता’ या नावाने प्रसिद्ध असून तो वैदिक तत्वज्ञानाचा श्रेष्ठ ग्रंथ ठरला आहे. हे फार मोठे कार्य श्रीकृष्णांनी केलेले आहे. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने नसते तर पांडवांनी युद्ध केलेच नसते व आयुष्यभर त्यांनी जंगलात दिवस काढले असते. 

    भगवंतांनी यात कर्माचे सुंदर विवेचन केले. कर्माचे फळ त्याच्या हेतूवर अवलंबून असते. ‘हे कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून अहंकाररहित व फलाची आकांक्षा सोडून केलेल्या कर्माचे फळ कर्त्याला लागत नाही, तेव्हा धनुष्य घे व लढ’ असा थोडक्यात त्यांचा उपदेशाचा आशय होता. आपले तत्वज्ञान त्यांनी अर्जुनाच्या गळी उतरवले. आणि नंतर त्याला विश्वरूप दाखवून सर्व कौरवसेना विश्वरूपाच्या मुखात जात असलेली दाखवली. व सांगितले की मीच काळ आहे व लोकांना ठार मारण्यास मीच येथे प्रवृत्त झालो आहे. तेव्हा 

    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुक्ष्व राज्यं समृद्धम् ।
    मयैवेव निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥११-३३॥गीता॥

भगवान् म्हणातात की, “अर्जुना, तू ऊठ व शत्रूंना जिंकून यश प्राप्त करून घे. मी यांना ठार मारलेलेच आहे, तू फक्त निमित्तमात्र हो.” शेवटी त्यांनी 

    ‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
    स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ॥१८-७३॥गीता॥ भीष्मपर्व ४२-७३॥

“हे श्रीकृष्णा आपल्या कृपेमुळे माझा मोह नाहीसा झाला व मला स्मृति प्राप्त झाली आहे. माझा संशय नाहीसा झालेला आहे. आता मी तू सांगशील तसे करीन.” असे त्यांनी अर्जुनाकडून वचन घेतले व मग धैर्याने पांडवसेना कौरवांशी युद्ध करायला लागली.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment