श्रीकृष्णाच्या समजावणी नंतर भीष्म, द्रोण, विदुर व धृतराष्ट्रानेही त्याला समजावले. ‘वासुदेवार्जुनौ यत्र विद्ध्यजेयानलं हि तान्’ ज्यांच्या बाजूने श्रीकृष्ण व अर्जुन आहेत त्यांना तू अजेय समज, असाच सर्वांच्या उपदेशाचा सूर होता.
श्रीकृष्ण व कुरुवृद्धांनी समजावूनही दुर्योधन ऐकण्यास तयार नव्हता. उलट सर्व सभाजनांमधे आपली निंदा केल्याबद्दल त्याने श्रीकृष्णांनाच दूषण दिले. ‘पांडवांना द्युत खेळ अधिक पसंत होता. म्हणूनच ते द्यूत खेळण्यास प्रवृत्त झाले. आणि माझे मामा शकुनि यांनी त्यांचे राज्य जिंकले यात माझा काय दोष ? बर त्यावेळी जिंकलेले धन आम्ही त्यांना त्यावेळीच परत केले. आता पुन्हा ते द्यूतात हरून त्यांना वनवास भोगायला लागला यात आमचा काय अपराध ? आणि तुम्ही कितीही पांडवांच्या शौर्याची प्रशंसा केलीत तरी आम्हाला जिंकण्याचे साहस करेल असा एकही वीर मला दिसून येत नाही. भीष्म, द्रोण, कृपाचार्य व कर्ण यांच्याशी देव सुद्धा युद्ध करू शकणार नाहीत. आम्ही क्षत्रिय आहोत त्या धर्माप्रमाणेच आम्ही युद्ध करू. रणांगणात मृत्यु आला तर आम्हाला स्वर्गच मिळेल. तेव्हा
ध्रियमाणे महाबाहौ मयि सम्प्रति केशव ।
यावद्धि तीक्ष्णया सूच्या विध्येदग्रेन केशव ।
तावदप्यपरित्याज्यं भूमेर्नः पाण्डवान् प्रति ॥१२७-२५॥ उद्योगपर्व॥
“केशव, यावेळी मी दुर्योधन जिवंत असतांना पांडवांना टोकदार सुईने छेदली जाईल एवढी भूमी सुद्धा पांडवांना दिली जाणार नाही.”
‘आपला काहीच दोष नाही’ अशा प्रकारचे साळसूदपणाचे ते दुर्योधनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांना संताप आला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याची सर्व करतूत सर्व राजांच्या सभेपुढे मांडली. ते दुर्योधनाला म्हणाले, “पांडवांच्या समृद्धीने संतप्त होऊन पांडवांच्या बरोबर द्यूत खेळायचे हा विचार तूच शकुनीसह निश्चित केला होतास. त्य़ाशिवाय निष्कपट पांडव येथे द्यूत खेळायला आलेच कशाला असते ? तूच सदाचाराकडे न पहाता पापासक्त लोकांसहित भयंकर विपत्तीला कारणीभूत होणारा हा खेळ सुरू केला होतास. तूच आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला भर सभेमधे आणून अनुचित गोष्टी बोलून दुराचरण केले होतेस. तू त्या एका सत्वशील महाराणीबरोबर वाईट वर्तन केलेस. पांडव वनात निघाले असतांना तूच त्यांना कठोर वचने बोलला होतास. ते तर सर्वच कौरवांना माहीत आहे. तू, कर्ण व दु:शासन यांनी आर्यांना न शोभणरी वचने बोलला होतात. त्यापूर्वी वारणावतात त्यांना मातेसहित जाळून मारण्याचा प्रयत्न केला होतास. पण तो तुझा उद्देश सफल झाला नाही. तेव्हाही पांडव दीर्घकाळपर्यंत वनात लपून राहिले होते. तूच भीमाला विष दिलेस व हातपाय बांधून पाण्यात बुडवले होतेस. आणि वर म्हणतोस माझा काहीही दोष नाही म्हणून ? आता तू पांडवांना त्यांचे राज्य देण्याचे नाकारत आहेस पण जेव्हा मृत्युमुखी पडशील तेव्हा तुला त्यांचे राज्य देणेच भाग पडेल.” श्रीकृष्णांचे ते वचन ऐकून दु:शासनालाही मनातून भीती वाटायला लागली व त्यानेही त्याला पांडवांचे राज्य परत देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दुर्योधन अतिशयच संतापला. व सभेतून उठून निघून गेला त्याच्याबरोबर त्याचे भाऊ, मंत्री व सहयोगी सुद्धा निघून गेले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment