Saturday, March 30, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १९

श्रीकृष्णांची कर्णाला पांडवांच्या पक्षाकडे वळवण्याची पराकष्ठा - 

    युद्ध सुरू होण्यापूर्वी युधिष्ठिराने कवच काढले, शस्त्रे खाली ठेवली, रथातून उतरला व भीष्मांच्या रोखाने पायी चालू लागला. त्याच्या या कृतीने बाकीचे सर्व पांडव बुचकळ्यात पडले. तेही त्याच्या मागोमाग जाऊ लागले. युधिष्ठिराने भीष्मांना नमस्कार केला व युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. तसेच द्रोणाचार्य, कृपाचार्य यांचाही आशीर्वाद घेतला. युधिष्ठिर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत होता तोपर्यंत श्रीकृष्ण कर्णाकडे गेले. 

    युद्धाच्या आधी जेव्हा दोन्ही पक्षामधे रथी अतिरथी कोण कोण आहेत हे भीष्म दुर्योधनाला सांगत असतांना कर्ण दोनतीनदा अर्जुनाबरोबर झालेल्या युधातून पळून आला होता म्हणून त्यांनी कर्णाला अर्धरथी म्हटले होते. त्याचा राग येऊन कर्णाने प्रतिज्ञा केली होती की ‘जोपर्यंत भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत मी युद्ध करणार नाही.’ म्हणून श्रीकृष्ण कर्णाकडे गेले व त्याला म्हणाले की ‘राधेय, भीष्म जिवंत असे पर्यंत तू युद्ध करणार नाहीस असे ऐकून आहे. तर तोपर्यंत तू पांडवांच्या बाजूने लढ. भीष्मांचा वध झाला की पुन्हा तू दुर्योधनाच्या बाजूने लढ.’ अर्थातच कर्णाने ही गोष्ट मान्य केली नाही. कारण तो दुर्योधनाचा सच्चा मित्र होता. बाकीचे भीष्म, द्रोण वा कृपाचार्य ‘अर्थस्य पुरुषो दास:’ असे म्हणून आम्ही कौरवांशी धनाने बांधले गेलेलो आहोत पण मनोमन तुझ्य़ाच विजयाची इच्छा करतो असे युधिष्ठिराला म्हणाले होते पण कर्ण मात्र दुर्योधनाशी प्रेमाने बांधला गेलेला होता. त्यामुळे त्याने श्रीकृष्णांच्या या विनंतीला मान दिला नाही. पण शेवट पर्यंत श्रीकृष्णांनी कर्णाला आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सोडले नाहीत असेच दिसते. 

श्रीकृष्णांचे हातात शस्त्र घेणे - 

    नंतर प्रत्यक्ष त्या घमासान युद्धाला प्रारंभ झाला. भीष्मांच्या अधिपत्याखाली कौरवांची सेना लढत होती. काही वेळा पांडवांची सरशी होत होती तर काही वेळा कौरवांची सरशी होत होती. जेव्हा कौरव पांडवांकडून पराभूत होत असत तेव्हा तेव्हा दुर्योधन संतापत असे भीष्मांना बोल लावत असे, व भीष्मांना आपल्या वाग्बाणांनीघायाळ करत असे. तेव्हा भीष्म आपला पराक्रम दाखवत असत. मग ते पांडवांना आवरता आवरत नसत. पांडवांची सेना त्यांच्या पराक्रमापुढे निष्प्रभ ठरू लागे. 

    दोनदा असे घडले की दुर्योधनाच्या वाग्बाणांनी घायाळ झालेले भीष्म पांडवांवर चाल करून आले. पांडवांची सेना त्यांच्या पराक्रमापुढे निष्प्रभ ठरली व पळून जाऊ लागली तेव्हा तेव्हा सैनिकात नवचैतन्य आणण्य़ासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाला भीष्मांशी लढण्यास सांगितले व रथ भीष्मांच्या दिशेला वळवला. ते पाहून युधिष्ठिराची पळून जात असलेली सेना पुन्हा युद्धासाठी परत फिरली. त्यावेळी श्रीकृष्णांचे सारथ्याचे कौशल्य दिसून आले. भीष्म त्यांच्या रथावर बाण सोडत असत, म्हणून श्रीकृष्ण रथ मंडलाकार फिरवत, त्यामुळे भीष्मांचे बाण व्यर्थ गेले. तरीही भीष्मांनी श्रीकृष्ण व अर्जुनाला आपल्या बाणांनी घायाळ केलेच होते. 

    युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाले. तरी भीष्म आपला पराक्रम गाजवतच होते. हाजारो रथांचे तुकडे झाले होते. हजारो घोडे, हत्ती निष्प्राण झाले होते जिकडे तिकडे रक्ताची नदी वहात होती. कवच, बाण, पट्टीश, गदा, धनुष्ये छिन्न भिन्न होऊन जिकडेतिकडे विखुरले होते. पांडवांच्या सेनेत घबराहट पसरली. युद्धातून पळून जाणार्‍या राजांना पांडव थोपवून धरू शकत नव्हते. 

    तेव्हा श्रीकृष्णांनी पुन्हा अर्जुनाला डिवचले. “पूर्वी विराट नगरात मोठ्या आवेशाने भीष्मद्रोणांदींना ठार मारायची प्रतिज्ञा केली होतीस ना ? आता ती सत्य करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. अर्जुना, आता क्षत्रिय धर्माचे स्मरण करू सर्व चिंता सोडून युद्ध कर.” असे म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ पुन्हा भीष्मांच्या दिशेने वळवला. भीष्मांनी अर्जुनाच्या रथावर बाणांचा वर्षाव करण्य़ास सुरवात केली की बाणांनी रथ झाकला गेला. परंतु श्रीकृष्ण न घाबरता धैर्य धारण करून अर्जुनाचे घोडे शीघ्रतेने हाकीत होते. वेगवेगळ्या पवित्र्यात रथ हाकीत असल्यामुळे भीष्मांचे बाण व्यर्थ जात होते. श्रीकृष्णांना अर्जुन मन लाऊन युद्ध करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे श्रीकृष्ण संतापले व त्यांनी रथातून खाली उडी घेतली व ते भीष्मांचा वध करण्याच्या इच्छेने त्यांच्यावर धाऊन गेले.  अर्जुनाने श्रीकृष्णांना अडवले, त्यांना त्यांच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली व भीष्मांना आपण ठार मारू असे वचन दिले. तेव्हा पुन्हा श्रीकृष्ण रथावर परतले. 

    युद्ध सुरू झाल्यापासून भीष्म अविरतपणे पांडवसेनेचा संहार करत होते. शेवटी त्यांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणेच शिखंडीला पुढे करून अर्जुन व इतरांनी मिळून भीष्मांना बाणशय्येवर झोपवले. सतत दहा दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी भीष्मांनी विश्रांती घेतली. देह शरशय्येवर होता. पण दक्षिणायन असल्यामुळे त्यांनी उत्तरायणात प्राण सोडण्याचे ठरवले होते. भीष्म पडल्यावर पांडवसैन्यात जोम आला. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराचे अभिनंदन केले. तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की, ‘आपणच आमचे आश्रय अहात व भक्तांना अभयदान देणारे अहात. आपल्याच कृपाप्रसादाने विजय प्राप्त होतो.” युधिष्ठिराचे हे बोलणे ‘तवैवैतद्युक्तरूपं वचनं पार्थिवोत्तम’ “नृपश्रेष्ठ, आपले वचन सर्वथा युक्तिसंगत आहे’ असे म्हणून श्रीकृष्णांनी मान्य केले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment