Friday, March 15, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ४

विराटनगरातील श्रीकृष्णांचे भाषण - 

विराटाच्या नगरीत अर्जुनपुत्र अभिमन्यु व उत्तरा यांचा विवाह समारंभ पार पडला. आता पुढच्या हालचालींना वेग आला. पांडवांनी अटीप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढली होती. आता ठरल्याप्रमाणे दुर्योधनाने त्यांचे राज्य त्यांना परत करायला हवे होते. तेव्हा पुढे काय करायचे त्यावर तिथे विचारमंथन सुरू झाले. त्यावेळी श्रीकृष्णांनी तिथे जे भाषण केले ते पहाण्य़ासारखे आहे. श्रीकृष्णांनी दुर्योधनाने पांडवांचे पैतृक राज्य रणांगणावर नव्हे तर कपटद्यूतात जिंकले आहे यावर भर दिलाच पण त्याशिवाय पांडव लहान असतांना जेव्हा कुंती पांडुराजाच्या निधनानंतर त्यांना हस्तिनापुरात घेऊन आली तेव्हा सुद्धा कौरवांनी अनेक षडयंत्रे रचून त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता याचा पुनरुच्चार केला. आणि आता ठरलेल्या अटीप्रमाणे पांडव वागल्यानंतरही दुर्योधन त्यांना जर त्यांचे राज्य देणार नसला तर युद्ध हाच एक पर्याय उरतो याचीही जाणीव त्यांनी सभेला करून दिली. व सर्वांच्या मतानुसार दुर्योधनाचे मत जाणून घेण्याकरता हस्तिनापूरला दूत पाठवायचे ठरले. तसेच कौरव पांडवांनी सैन्याच्या जुळवाजुळवीलाही सुरवात केली. 

द्रुपदाचा पुरोहित कौरवांकडे - 

    त्यानुसार प्रथम द्रुपदाचा पु्रोहित कौरवांकडे गेला. दुर्योधनाने पांडवांना प्राणांतिक कष्ट दिले आहेत, त्यांचा त्याने वध करण्याचा हरप्रकारे प्रयत्न केलेला आहे, पांडवांनी आपल्या बाहुबळावर जी संपत्ती प्राप्त केली होती तीही त्याने कपटद्यूतात बळकावली आहे, त्या द्यूतकर्माला धृतराष्ट्रानेही अनुमोदन दिले, पांडवांची पत्नी द्रौपदी हिलाही क्लेश दिलेले आहेत आणि धृतराष्ट्राने सर्व राज्य आपल्या ताब्यात घेतले आहे, या सर्व गोष्टींचा त्याने तिथे उच्चार केलाच व सांगितले की ‘हे पहिले केलेले अत्याचार विसरून पांडव कौरवांशी मेळ करू इच्छितात. वीर पांडव कौरवांशी युद्ध करू इच्छित नाहीत तर युद्ध न करताच आपले राज्य प्राप्त करू इच्छितात. तेव्हा कुरुवृद्धांनी दुर्योधनाला समजावावे. याचा अर्थ पांडव कौरवांना घाबरले आहेत असा नाही. त्यांनी सेना जमवलेली आहे व वेळ आली तर ते युद्ध करण्य़ासही तयार होतील. आणि पांडवांचे सैन्य कौरवांच्या तुलनेत कमी असले तरी पांडव आपल्या बाहुबळावर युद्ध करण्यास तयारही आहेत. तेव्हा आपण लोकांनी विचार करावा, पांडवांचे अर्धे राज्य त्यांचे त्यांना परत द्यावे व युद्ध टाळावे. हातात आलेली ही सुंदर घडी व्यर्थ घालवू नये.” असा पुरोहिताने कौरवांकडे पांडवांचा निरोप सांगितला. 

संजय शिष्टाई - 

    द्रुपदाच्या पुरोहिताकरवी पांडवांचा निरोप ऐकून धृतराष्ट्राने संजयाबरोबर पांडवांना शर्करावगुंठित संदेश पाठवला. संजयाने युधिष्ठिराला सांगितले की ‘सर्व कौरव ठीक आहेत. धृतराष्ट्रही नित्य तुमच्या सदाचरणाची व पराक्रमाची आठवण काढत असतात. कोणत्याही स्वार्थाकरता पांडव कधी धर्माचा त्याग करणार नाहीत असा त्यांचा विश्वास आहे. तेव्हा अजात शत्रो, आपणच यातून काहीतरी मार्ग काढावा.’ पुढे त्याने सांगितले की ‘स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे पापदायक आहे. आपले पुत्र मूर्ख असून अधर्माने वागतात व त्यांचा निग्रह करण्यास पांडव समर्थ असले तरी आपल्या बंधुजनांचा वध करून त्यांना पापच लागेल व नरकप्राप्ती होईल. तेव्हा त्यांनी वनातच निवास करावा किंवा भैक्ष्यकर्म स्वीकारावे.’ पाप व नरकाची जशी त्य़ाने भाषा केली त्याप्रमाणेच आपल्या पक्षाला द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य यांचे सहाय्य असून अनेक राजे येऊन मिळालेले आहेत अशी अप्रत्यक्ष धमकीही दिली आणि वर सांगितले की तुम्हाला जर युद्धच करायचे होते तर तेव्हाच द्यूताच्या वेळीच करायला हवे होते. कारण ही विशाल सेना तेव्हा तुमच्याच आधीन होती. तेव्हा तुम्ही बलशाली होता व तेव्हाच तुम्ही दुर्योधनाशी युद्ध करून त्याला नेस्तनाबूत करू शकला असतात. मग तुम्ही कशासाठी इतका विलंब केलात व शत्रूची ताकद वाढवण्य़ास वेळ दिलात ? आता वेळ निघून गेली आहे. ही विशाल सेना आता दुर्योधनाच्या ताब्यात आहे आणि ह्या विशाल सेनेचा पराभव करणे आता दुष्कर आहे.’ अर्थात संजय दूत म्हणून आला होता. राजा जे सांगेल ते प्रतिपक्षाला सांगणे एवढेच दूताचे काम. तेव्हा संजयाने सांगितला तो धृतराष्ट्राचा निरोप पांडवांना सांगितला व त्याने त्याचे काम केले. 

    पांडव धर्माच्या मार्गाने जाणारे आहेत. तेव्हा त्यांना पाप व नरक यांच्या गोष्टी संघितल्या तर ते आपणहून राज्य दुर्योधनाच्या ताब्यात देऊन वनात रहातील अशी धृतराष्ट्राची अटकळ होती. सुरवातीला या त्याच्या वचनांचा परिणाम पांडवांवर झालेला नाही पण ऐन युद्धाच्यावेळेला अर्जुन हातपाय गाळून युद्ध करण्य़ास नकार देऊन बसला हा त्या संजयाच्या शिष्टाईचाच परिणाम होता.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment