Wednesday, March 27, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १६

श्रीकृष्णांची दोन्ही पक्षांना मदत -

    शिष्टाईच्या आधीपासूनच सर्वांची जुळावाजुळवी चाललेली होती. जो प्रथम सहाय्य मागायला येईल त्याला मदत द्यायची हा त्याकाळचा नियम होता. त्यामुळे प्रत्येकजणच मदतीसाठी दुसरा पक्ष तिथे पोचण्याच्या आधी आपण पोचण्याचा प्रयत्न करत होता. 

    विराटनगरातून उत्तरा व अभिमन्यु यांचा विवाह आटोपून व कौरवांकडे समेटाकरता दूत पाठवायचे ठरवून श्रीकृष्ण द्वारकेला चालले. दुर्योधनाने गुप्तचरांमार्फत सर्व बातमी काढली होती. तो वायुवेगाने द्वारकेला निघाला. त्याचवेळी अर्जुनही सहाय्य मागण्याच्या हेतूने श्रीकृष्णांच्याकडे आला होता. दोघांनीही पाहिले की श्रीकृष्ण झोपलेले आहेत. श्रीकृष्णांच्या शयनकक्षात प्रथम दुर्योधनाने पाऊल ठेवले. श्रीकृष्ण झोपलेले आहेत असे पाहून तो त्यांच्या उशागती ठेवलेल्या आसनावर बसला. नंतर अर्जुनाने प्रवेश केला तो नम्रतेने हात जोडून श्रीकृष्णांच्या पायापाशी बसला. जाग आल्यावर श्रीकृष्णांना पायापाशी बसलेला अर्जुन प्रथम दिसला. श्रीकृष्णांनी दोघांचाही आतिथ्य सत्कार करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा दुर्योधनाने सांगितले की भावी युद्धात आपण मला सहाय्य करा. मी आपल्याकडे प्रथम आलेलो आहे व प्रथम जो मदत मागतो त्याला मदत करणे हा धर्म आहे.” तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले, “दुर्योधना, तू पहिल्यांदा आला आहेस ही गोष्ट खरी असली तरी मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे. तेव्हा मी दोघांनाही मदत करीन. एका बाजूला माझी ही सर्व विशाल सेना आहे. व दुसर्‍या बाजूला मी एकटा आहे. परंतु ‘अयुध्यमाने संग्रामे न्यस्तशस्त्रोऽहमेकत:’ ‘मी युद्ध करणार नाही वा शस्त्रही धारण करणार नाही ’. या दोन्हींपैकी काय पाहिजे त्याची निवड करायची आहे. आणि अर्जुन हा तुझ्यापेक्षा लहान आहे. तेव्हा निवडीचा पहिला अधिकार त्याचा आहे.” तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांचीच निवड केली. अर्थातच श्रीकृष्णांची सर्व सेना दुर्योधनाला मिळाली. त्यालाही तेच हवे होते. युद्ध न करणारा व एकटा श्रीकृष्ण त्याला नकोच होता. सैन्य मिळाल्यावर दुर्योधन स्वत:ला कृतार्थ मानून हस्तिनापूरला परत गेला. आपण श्रीकृष्णांना का निवडले याचे कारण सांगतांना अर्जुन म्हणतो -

    भवांस्तु कीर्तिमाँल्लोके तद् यशस्त्वां गमिष्यति ।
    यशसां चाहमप्यर्थी तस्मादसि मया वृत: ॥७-३६॥ उद्योगपर्व॥

     भगवन्, आपण संसारात यशस्वी अहात. आपण जेथे असाल तेथे यश मागोमाग येईल. आणि मला यशाची इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. आणि माझी अनेक दिवसांची ही इच्छा आहे की आपण माझे सारथी व्हावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.” तेव्हा भगवंतांनी अर्जुनाचे सारथी होण्य़ाचेही मान्य केले.

    येथेही श्रीकृष्णांचे कौटिल्य प्रगट झाले आहे. दोघांचीही त्यांनी मदत केली. आपल्याला सैन्य देऊन श्रीकृष्णाने फसवले आहे हे शेवटपर्यंत दुर्योधनाला कळलेच नाही.

    नंतरही वेळोवेळी श्रीकृष्णांच्यामुळेच पांडवांना विजयाकडे घोडदौड करता आली. श्रीकृष्ण पांडवांच्या पक्षाला नसते तर पांडवांना जय मिळाला असता की नाही हा प्रश्नच होता. कारण असे अनेक प्रसंग उद्भवले आहेत की प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णांनी पांडवांना सावरले आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment