Thursday, March 14, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३

    ‘आपण द्वारकेमधे असतो तर पांडवावर ही विपत्ती येऊच दिली नसती. बिना बोलावताच आपण द्यूतसभेत येऊन द्यूताचे दोष दाखवून ते द्यूत थांबवायचा प्रयत्न केला असता आणि समजुतीच्या शब्दांनी जर कौरव ऐकले नसते तर आपण बलपूर्वक ते द्यूत थांबवले असते’ असे त्यांना वाटत होते. पण त्यावेळी ते शाल्वाशी युद्ध करण्यात गुंतलेले होते. त्यामुळे द्यूताच्या वेळी ते हजर राहू शकले नाहीत. पण एकूण श्रीकृष्णांना भावी युद्धाची चाहूल लागलेली होती व त्यात आपण पूर्णपणे पांडवांच्या बाजूने उभे रहायचे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवलेले होते.

    श्रीकृष्णांची पांडवांशी पांडव वनवासात असतांना दोन-तीनदा भेट झाली आहे व दरवेळी त्यांनी ‘आपण पराक्रम गाजवून शत्रूंचे अस्तित्व मिटवून टाकू अशी ग्वाहीही दिलेली आहे.    सात्यकीने तर असाही प्रस्ताव मांडला होता की तुम्ही वनवासाची प्रतिज्ञा पुरी करत रहा, तोपर्यंत आम्ही शत्रूला दंड देतो व तुम्ही परत येईपर्यंत अभिमन्यु पृथ्वीचे शासन करेल. एकूण पांडवांच्या पक्षाकडील सर्वांनाच दुर्योधनाला दंड देण्याची घाई झालेली आहे.

    पांडव अटीप्रमाणे शांत चित्ताने वनवास भोगत असतांनाही दुर्योधनादि कौरव त्यांना वनातही त्रास देण्य़ाचा प्रयत्न करतच होते. वनातच त्यांना ठार मारण्याकरता सुद्धा निघाले होते तेव्हा व्यासांनी अडवले म्हणून कौरव गप्प बसले. एकदा घोषयात्रेचे निमित्त करून त्यांची दुर्दशा बघण्य़ासाठी वनात गेले होते. एकदा दुर्वास ऋषींना दुर्योधनाने अतिथि सत्कार करून प्रसन्न करून घेतले व त्यांना त्य़ाने पांडवांकडे अवेळी अतिथि म्हणून जाण्य़ास सांगितले. हेतु हा होता की पांडव अतिथिसत्कार करू शकणार नाहीत व दुर्वासांच्या शापाने त्यांचा आपोआपच नाश होईल. तेव्हाही भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे रक्षण केले. जयद्रथाने द्रौपदीहरणाचा प्रयत्न केला. अशा प्रकारे कौरव पांडवांना वनवासात सुद्धा सुखाने जगू देत नव्हते.

    नंतर अर्जुनाने वनवासात असतांना तपस्या करून पाशुपतास्त्र व इंद्रादि देवतांकडून अस्त्रे मिळवली व पुन्हा आपल्या बांधवांकडे आला. बारा वर्षांचा वनवासाचा काळ संपत आलेला होता. अजून एक वर्ष अज्ञातवासाचे शिल्लक होते. तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्ण पांडवांना भेटण्य़ासाठी वनात आलेले आहेत. तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, “धर्मराज आपले मनोरथ शीघ्र पूर्ण होतील. आपली वनवासाची प्रतिज्ञा पूर्ण झाली असेल तर आम्ही सर्व लोक कौरवांना दंड देण्यास तयार आहोत. आम्ही सर्व आपल्या आज्ञेची वाट पहात आहोत. किंवा आपण आपल्या प्रतिज्ञेचे पालन करा व आम्ही सर्व यदुवंशी योद्धे आपल्या सर्वशत्रूंना ठार मारू व हस्तिनापुरात आपल्या शुभागमनाची प्रतीक्षा करत राहू. तुम्ही वनवासाची प्रतिज्ञा पूर्ण करून हस्तिनापुरात या.” पण युधिष्ठिर प्रतिज्ञेप्रमाणे अज्ञातवासाचे वर्ष पूर्ण करूनच पुढील काय तो निर्णय घेण्यावर ठाम होता. युधिष्ठिराचा प्रतिज्ञापालनाचा कालावधी संपल्याशिवाय काहीही करता येणार नाही हे श्रीकृष्णांनी जाणले. तेव्हा अज्ञातवासाचा काळ संपेपर्यंत वाट पहावीच लागणार होती. थोडक्यात युद्धाशिवाय पर्याय नाही याची खूणगाठ श्रीकृष्णांनी मनाशी बांधलेली होती. 

   पांडव विराटाच्या राज्यात अज्ञातवासाचा काळ कंठत होते. युधिष्ठिर विराटाला द्यूत शिकवणारा कंक बनला होता, भीम विराटाचा बल्लव नावाने आचारी बनला होता. अर्जुन बृहन्नडेचा स्त्रीवेष घेऊन विराटाची मुलगी उत्तरा हिचा नृत्यशिक्षक बनला होता. नकुल व सहदेव विराटाचे गोधन व घोड्यांची पागा सांभाळत होते तर द्रौपदी विराटाच्या राणीकडे सैरंध्री म्हणून राहिली होती. पांडवांना शोधून काढण्याच्या इच्छेने कौरवांनी विराटाचे गोधन हरण्याचे ठरवले व विराटावर दोन बाजूंनी हल्ला केला. स्वत: विराट चार पांडवांना बरोबर घेऊन ससैन्य एका आघाडीवर त्रिगर्ताच्या सुशर्माबरोबर युद्ध करण्यात गुंतला असतांनाच दुर्योधनाने भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण वगैरे सर्व कौरवांबरोबर दुसर्‍या बाजूने गोधनावर हल्ला केला. राजधानीत एकटा उत्तर हा विराटाचा मुलगा होता. तो तर घाबरून गेला. शेवटी बृहन्नडेच्या वेशात असलेला अर्जुन उत्तरचा सारथी बनला व त्याने सगळ्या कौरवांचा पराभव केला. तेव्हा विराटाला पांडव हे आपल्या आश्रयाने रहात आहेत असे कळले. व त्याने आपली मुलगी उत्तरा अर्जुनाला देण्य़ाचे ठरवले.  तेव्हा अर्जुनाने ती शिष्या असल्यामुळे आपण तिच्याशी लग्न करू शकत नाही असा स्पष्ट शब्दात पण नम्रपणे नकार देऊन तिचा आपला मुलगा अभिमन्यु याची पत्नी म्हणून म्हणून स्वीकार करण्याचे ठरवले. विराटाला ते मान्य होताच अभिमन्यु व उत्तराच्या विवाहासाठी द्रुपद व यादव वीरांसह भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिथे विराटाच्या राज्यात उपस्थित झाले. आणि विवाह-समारंभ पार पडल्यानंतर पांडवांच्या न्याय्य हक्काच्या विषयाबाबत तोंड फुटले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment