वास्तविक ‘न धरी शस्त्र करी मी’ अशी श्रीकृष्णांनी प्रतिज्ञा केली होती. ते युद्धात प्रत्यक्ष लढाईत भाग घेणार नव्हते. तर त्यांचा युद्धामधे कोणा्त्या प्रकारचा सहभाग होता ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ते अर्जुनाच्या रथाचे सारथी बनणार होते. आणि युद्धामधे जेवढे महत्व प्रत्यक्ष योद्ध्याला असते तसेच महत्व सारथ्यालाही असते. आणि अर्जुनाच्या केवळ रथाचेच ते सारथी झाले नव्हते तर त्यांनी अर्जुनाच्या जीवनरथाचेच सारथ्य केले होते. त्यामुळे त्यांचा युद्धातील सहभाग हा अमौलिक होता.
श्रीकृष्ण-शिष्टाईचा काहीही उपयोग झाला नाही. दुर्योधनाने पांडवांना त्यांचे राज्य देण्याचे नाकारले. त्यामुळे आता युद्ध हाच एकमेव पर्याय उरला होता. त्यानुसार दोन्ही सैन्यांची जुळावाजुळवी झाली आणि त्यांनी कुरुक्षेत्रावर कूच केले.
युद्ध निश्चित झालेले असले तरी संजयाने जे शिष्टाईच्या वेळी ‘स्वजनवधाने पाप लागेल’ हे बीज पेरले ते पांडवांच्या मनात रुजलेले होते. ते केव्हा ना केव्हा तरी कुणाच्या ना कुणाच्या मनात अंकुरतच होते. कुरुक्षेत्रावर पांडवसेनेचा पाडाव पडला व शिबिरांची उभारणी सुरू झाली. आता युद्धात अवध्य मनुष्यांचा सुद्धा वध करावा लागणार या कल्पनेने युधिष्ठिर दु:खी झाला. युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करून सुद्धा त्याचा काहीही उपयोग झाला नाही याबद्दल त्याला वाईट वाटत होते. तो म्हणतो
कथं ह्यवध्यै: संग्राम: कार्य: सह भविष्यति ।
कथं हत्वा गुरून् वृद्धान् विजयो नो भविष्यति ॥१५४-२२॥उद्योगपर्व॥
“जे मारण्य़ास योग्य नाहीत त्यांच्या बरोबर युद्ध करणे उचित होईल का ? वृद्ध गुरुजनांचा वध करून मिळालेला विजय कशा प्रकारचा असेल ?”
यावर परस्पर अर्जुनानेच उत्तर दिले की श्रीकृष्ण व विदुर आपल्याला अधर्माच्या गोष्टी सांगणारच नाहीत. आणि अशा परिस्थितीत युद्धातून परत फिरणेही योग्य होणार नाही.” त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाचे मत बरोबर आहे असे म्हणून युधिष्ठिराकडे पाहून फक्त हसले.
पुढे भीष्मांनी रचलेला व्यूह पाहून तो म्हणतो
ते वयं संशयं प्राप्ता: ससैन्या: शत्रुकर्षण ।
कथमस्मान्महाव्यूहादुत्थानं नो भाविष्यति ॥२१-५॥भीष्मपर्व॥
अर्जुना, आपण आपल्या सैन्याबरोबर प्राणसंकटात सापडलो आहोत. या मोठ्या व्यूहापासून आपले रक्षण कसे होणार ?
तेव्हाही अर्जुनाने उत्तर दिले की “राजन् जेथे धर्म असतो तेथे विजय असतो. तेव्हा अहंकारशून्य होऊन युद्ध करा. नारदांनीही सांगितले आहे की ‘यत: कृष्णस्ततो जय:’ जेथे कृष्ण आहे तेथे विजय आहे. आणि विजय हे कृष्णाचे एक नाव आहे आणि विनय हा त्यांचा दुसरा अद्वितीय गुण आहे. तेव्हा काळजी करू नका. श्रीकृष्ण आपल्या पक्षाला आहेत तेव्हा आपलाच जय होणार आहे. तेव्हा आपल्याला काहीही चिंता करण्याचे कारण नाही.”
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment