Saturday, May 4, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १६)

हनुमंतांचा    रावणास उपदेश  :

    रावणाला स्वत:ची ओळख करून दिल्यानंतर ते रावणाला म्हणाले, “हे महामान्य रावणा ! तू धर्म आणि अर्थ यांचे तत्त्व जाणतोस. तू फार मोठ्‍या तपाचाही संग्रह केला आहेस म्हणून परस्त्रीला आपल्या घरात डांबून ठेवणे तुला केव्हाही योग्य नाही. धर्माविरूद्ध कार्यात फार मोठे अनर्थ भरलेले असतात. ते कर्त्याचा समूळ नाश करून टाकतात. म्हणून तुझ्यासारख्या बुद्धिमान पुरुषाने अशा कार्यास प्रवृत्त होता उपयोगी नाही. हे राजन ! तिन्ही लोकात असा एकही प्राणी नाही की जो भगवान श्रीरामांचा अपराध करून सुखी राहू शकेल. म्हणून हे माझे धर्म आणि अर्थ यांना अनुसरून असलेले आणि सर्वकाळी हितावह असणारे भाषण तू लक्षात घे आणि जानकीला पुरुषश्रेष्ठ श्रीरामास परत दे. सीता तुझ्या घरात पाच फणा असलेल्या नागिणी प्रमाणे निवास करीत आहे. तिला तू पूर्णपणे ओळखलेले नाहीस. तू तपस्येचे कष्ट घेऊन हा धर्माचे फळस्वरूप जो ऐश्वर्याचा संग्रह केला आहेस आणि शरीर आणि प्राणांनाही दीर्घकाळ पर्यंत धारण करण्याची शक्ति प्राप्त केली आहेस, त्याचा विनाश करणे उचित नाही. तुला तपामुळे देव आणि असुर यांच्याकडून जी अवध्यता प्राप्त झाली आहे तिचे कारणही तुझे हे धर्माचरण आहे. जो पुरुष प्रबळ अधर्माच्या फळाने बांधला जातो तो बद्ध होतो, त्याला धर्माचे फळ मिळत नाही; त्याला त्या अधर्मफळाचीच प्राप्ती होते. हां, जर त्याने त्या अधर्मानंतर कुठल्याही प्रबळ धर्माचे अनुष्ठान केले तर ते अनुष्ठान पहिल्याने केलेल्या अधर्माचे नाशक होते.  तू पहिल्याने जो धर्म केला होतास त्याचे फळ तुला येथे पूर्णरूपाने प्राप्त झाले आहे, यांत संशयच नाही. आता या सीताहरणरूपी अधर्माचे फळही तुला लवकरच भोगावे लागेल. जनस्थानातील राक्षसांचा संहार, वालीचा वध आणि राम आणि सुग्रीव यांचे सख्य - या तीन कार्यांचा कार्यकारण संबंध नीट जाणून घे आणि त्यानंतर आपल्या हिताचा विचार कर. जिला तू सीता असे समजत आहेस आणि जी सांप्रत तुझ्या ताब्यात आहे, ती संपूर्ण लंकेचा नाश करणारी काळरात्रच आहे, हे तू लक्षात ठेव. सीतेचे शरीर धारण करुन तुझ्याजवळ काळाचाच पाश येऊन पोहोचला आहे. त्यात स्वतः होऊन गळा अडकवणे ठीक नाही म्हणून आपल्या कल्याणाचा तू आता काही तरी विचार कर. नाहीतर श्रीरामांच्या क्रोधाने प्रदीप्त झालेली आणि सीतेच्या तेजाने आधीच दग्ध झालेली ही लंकानगरी, तिच्यातील मार्ग, इमारती यांसह जळत असलेली पाहण्याचा प्रसंग तुझ्यावर येईल. हे स्वतःचे मित्र, मंत्री, कुटुंबी जन, भ्राते, पुत्र, हितचिंतक, स्त्रिया आणि सुखोपभोगाची सर्व साधने आणि संपूर्ण लंका यांना तू मृत्युमुखांत ढकलू नकोस. त्यांच्या नाशास कारण बनू नकोस. नृपश्रेष्ठ श्रीरामांचा तू आपल्या कृत्याने अपराध केला आहेस म्हणून तुझे जीवित सुरक्षित राहणे कठीण आहे.” रावणाला केलेल्या उपदेशातही हनुमानांचे धैर्य व बुद्धिमत्ता दिसून येते.  

    वीरभावाने निर्भयतापूर्वक भाषण करणार्‍या महाकपि हनुमंतांचे ते भाषण सुंदर आणि संयुक्तिक होते. तथापि रावणाला ते अप्रिय वाटले. तेव्हा रावणाने हनुमानाचा वध करावा अशी आज्ञा केली. पण बिभीषणाने दूताचा वध करू नये अशी शास्त्राज्ञा सांगितली. तसेच हा जर मारला गेला तर आकाशमार्गाने येथे येणारा दुसरा कोणी प्राणी मला दिसून येत नाही आहे, जो महासागर उल्लंघून या बाजूस येऊ शकेल. या परिस्थितीमध्ये शत्रूच्या गति आणि विधिचा पत्ता आपल्याला लागू शकणार नाही. ह्याचा वध झाला तर आपल्याला विरोध करणार्‍या त्या दोन्ही स्वतंत्र प्रकृतीच्या राजकुमारांना युद्धासाठी तयार करू शकेल असा दुसरा कोणी दूत आढळून येत नाही. म्हणून हनुमानांना दुसरा दंड देण्याचे रावणाने ठरवले. वानरांना आपले पुच्छ फार प्रिय वाटते आणि तेच त्यांचे आभूषण आहे. म्हणून राक्षसराज रावणाने अशी आज्ञा केली की या वानराचे पुच्छ पेटवून द्यावे आणि राक्षसगणांनी त्याला रस्त्या रस्त्यांतून आणि चव्हाट्‍यावरून संपूर्ण नगरांतून फिरवावे. त्याची धिंड काढावी.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment