Thursday, May 2, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १४)

    सीताशोधाचे कार्य पूर्ण झाले होते. परंतु त्यांच्या दृष्टीने एक कार्य मात्र बाकी राहिले होते. ते म्हणजे रावणाच्या बळाचा अंदाज घेणे. शत्रूच्या बळाचा अंदाज साम, दाम, भेद व दंड  या चार उपायांनी घेता येतो. पण येथे राक्षसांच्या ठिकाणी सामाचा काही उपयोग होणार नाही. ते द्रव्यसंपन्न आहेत म्हणून त्यांना दान देणेही योग्य नाही. शिवाय त्यांना बळाचा गर्व झालेला असल्याने भेदाने काम साध्य होणार नाही. म्हणून केवळ चौथ्या उपायाचा, दण्डाचा प्रयोग करणे हाच उपाय हनुमानांना ठीक वाटला. त्यांना पराक्रम करून दाखविणेच उचित वाटले. राक्षसांमधील मुख्य मुख्य वीर मारले गेले तरच हे राक्षस नरम होतील असे त्यांना वाटले. 

कार्ये कर्मणि निर्दिष्टे यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्यं कर्तुमर्हति ॥५-४१-५॥
न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः ।
यो ह्यर्थं बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥५-४१-६॥ 

मुख्य कार्य पार पडल्यावर, पहिल्या कार्याला बाधा न येऊ देता, जो अनेक कार्ये पार पाडतो तोच हाती घेतलेले कार्य उत्तम प्रकारे शेवटास नेण्यास समर्थ होतो. लहान लहान कार्ये असली तरीही एकाच उपायाने पार पडतील असे नाही. जो पुरुष कुठलेही कार्य अथवा प्रयोजन अनेक प्रकारांनी सिद्ध करण्याची कला जाणतो तोच कार्य सिद्धिस नेण्यास समर्थ होऊ शकतो. असा त्यांनी विचार केला. शत्रूशी आपल्या पक्षाला युद्ध करण्याचा प्रसंग आला तर कोण प्रबळ होईल आणि कोण कमजोर ठरेल, शत्रूमध्ये आणि आपल्यामध्ये विशेष काय आहे, हे समजून आल्यानंतर जर आपण वानराधिपती सुग्रीवाकडे गेलो तर आपल्याकडून स्वामीच्या आज्ञेचे पूर्णरूपाने पालन झाले असे समजले जाईल असे त्यांना वाटले. त्यासाठी ते युद्धाची संधी कशी मिळेल या बद्दल विचार करू लागले. म्हणजे त्यांना तुलनात्मक दृष्टीने कोणचे पारडे अधिक जड आहे याचा विचार करता आला असता. त्या युद्धात त्यांनी रावणाचे मंत्री, सेना आणि सहायकांसह रावणाचा सामना करून त्याच्या अंतःकरणातील भाव तसेच, सैनिकांची शक्ती याची माहिती करून घेण्याचा विचार केला. म्हणून युद्धास तोंड फुटावे म्हणून त्यांनी रावणाला प्रिय असलेल्या अशोकवाटिकेचा विध्वंस करण्याचे ठरवले. म्हणजे रावण निश्चितच रागावला असता व सेनेसहित हनुमानांवर चालून आला असता. आपल्या पराक्रमावर हनुमानांचा कमालीचा विश्वास होता. त्यांनी रावणाने पाठवलेल्या सर्व सेनेचा वध करून किष्किंधेला जायचा विचार केला. 

    त्याप्रमाणे त्यांनी आपल्या प्रचंड वेगाने अशोकवाटिकेतील मोठे मोठे वृक्ष उन्मळून टाकले. सीता ज्या वृक्षाखाली बसली होती तो वृक्ष सोडून त्यांनी सर्व प्रमदवनाची नासधूस केली व राक्षसांबरोबर युद्ध करण्याच्या इच्छेने  ते प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले. प्रमदवनातील राक्षसीणींना भीती वाटेल असे भयंकर रूप त्यांनी धारण केले. रावणाला ही वार्ता समजताच त्याने आपले किंकर नावाचे सैनिक पाठवून दिले. ते सर्व हनुमानांवर तुटून पडले. आपण रामांचा दास असल्याचे त्यांनी त्यांना गर्जून सांगितले. त्यांची ती सिंहगर्जना ऐकताच सर्व राक्षस भयभीत झाले. दरवाजावरील परीघ घेऊन त्यांनी त्या निशाचरांना मारण्यास प्रारंभ केला. त्या किंकर नामक राक्षसांचा वध केल्यावर हनुमान पुन्हा त्या प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले.  

    त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की येथील  राक्षसांच्या देवालयाचा नाश करावा. ते देवालयावर चढले व त्या प्रासादाची मोडतोड करू लागले. मोडतोड करत असता ते श्रीरामांच्या नावाचा जयजयकार करत होते व भयानक आवाजात गर्जना करत होते. त्यांची गर्जना ऐकून प्रासादरक्षक नानाविध अस्त्रे घेऊन आले. त्यांच्याशी युद्ध करतांना त्यांनी त्या प्रासादाचा सोन्याचा खांब उपटून काढला व तो ते जोराजोराने फिरवण्यास लागले. तेव्हा दुसर्‍या खांबाशी घर्षण होऊन अग्नी उत्पन्न झाला. त्यामुळॆ तो प्रासाद जळू लागला. हनुमानांनी त्या खांबानेच शेकडो राक्षसांना मारून टाकले. आणि आकाशात स्थित होऊन तेजस्वी वाणीने बोलले, “राक्षसांनो ! सुग्रीवाच्या आज्ञेत वागणारे माझ्यासारखे असे हजारो विशालकाय बलवान वानरश्रेष्ठ सर्व बाजूस पाठवले गेले आहेत. आम्ही आणि इतरही वानर मिळून सर्व पृथ्वी हिंडत आहोत. आम्हापैकी काहीना दहा हत्तींचे बळ आहे. काही त्यांच्यापेक्षाही बलाढ्‍य आहेत, त्याच्यांत शंभर हत्तींचे बळ आहे. तर कित्येक वानर असे आहेत की ते हजारो हत्तींप्रमाणे बल आणि पराक्रमाने संपन्न आहेत. कांहीचे बळ जलाच्या प्रवाहासारखे असह्य आहे. कित्येक तर वायुच्या समान बलवान आहेत आणि कित्येक वानर यूथपति आपल्या ठिकाणी असीम बळ धारण करणारे आहेत. दात आणि नखे हीच ज्यांची आयुधे आहेत असे अनंत बलशाली शेकडो, हजारो, लाखो, करोडो वानर बरोबर घेऊन वानरराज सुग्रीव येथे येईल. ते सर्व तुम्हां सर्व निशाचरांचा संहार करण्यास समर्थ आहेत. आता तर ही लंकापुरी राहाणार नाही, तुम्हीही राहाणार नाही आणि ज्याने इक्ष्वाकुवंशीय वीर महात्मा श्रीरामांशी वैर बांधले आहे, तो रावणही राहू शकणार नाही.”  

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment