मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द का साहे ।
अज्ञाना घरी त्राये । वाउगियाचि ॥३-१२॥१५६॥
अज्ञाना घरी त्राये । वाउगियाचि ॥३-१२॥१५६॥
अर्थ - मोक्षच जर बंध ठरत असेल तर मग मोक्ष या शब्दाला अर्थ तरी काय राहिला ? (अशी जर शंका घेशील तर त्याचे उत्तर असे की) अज्ञानाच्या घरी या मोक्षाची खोटीच प्रतिष्ठा झाली आहे. किंवा त्या संरक्षण मिळाले आहे.
स्पष्टीकरण - अहंता असणे म्हणजे बंध व अहंता नसणे म्हणजे मोक्ष. जीवोऽहं व शिवोऽहं या दोन्हीमधे अहंकाराची भावना आहे. हा अहंकारच आपल्या स्वरूपावर जबरदस्तीने अंधार पाडतो, आत्म्याचे अस्तित्व लपवतो व प्रथम ‘जीवोऽहं’ म्हणायला लावतो. साधनेने जर मनुष्याला ‘शिवोऽहं’ असे ज्ञान झाले तरी हा अहंकार आपले खरे अस्तित्व लपवून बोध्य-बोधक रूपाने स्वस्वरूपाची जाणीव करून देतो. त्यामुळे नित्यमुक्तता त्याच्यापासून लांबच रहाते. कारण आत्मरूपात बोध्य, बोधक व बोध असे तीन भेद नसूनही ‘शिवोऽहं’ अशा ज्ञानजागृतीतही हा अहंकार हे तीन भेद दाखवतो. फक्त फरक एवढाच की ‘जीवोऽहं’ या भावनेमधे तो दृश्यरूपाने असतो व ‘शिवोऽहं या भावनेमधे तो अदृश्यरूपाने असतो. त्यामुळे या स्थितीलाही मोक्ष न म्हणता बंधच म्हटले पाहिजे असे ज्ञानदेवांचे मत आहे.
No comments:
Post a Comment